पुढील 25 वर्षे भाजपचीच सत्ता : मुख्यमंत्री

cm.jpg
cm.jpg
Updated on

पाथर्डी : "महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मुजोरी अनुभवली आहे. त्यामुळे पुढील पंचवीस वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात भाजपची सत्ता राहील. मोदी बलशाली राष्ट्रनिर्माणाचे महान कार्य करीत आहेत. आम्ही समृद्ध महाराष्ट्र तयार करण्याचे काम तुमच्या आशीर्वादाने करीत आहोत. तुमचा जनादेश घेऊन मुंबईत जाऊन आणि पुन्हा सरकार स्थापन करून तुमच्या भेटीला येईन,'' असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

पाथर्डी येथे बाजार समितीच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, सुरजितसिंग ठाकूर व मोनिका राजळे; बबनराव पाचपुते, माजी खासदार दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, "राज्याला वारी व यात्रेची परंपरा जुनीच आहे. पंढरपूरच्या यात्रेला जाऊन आपण विठोबाचे दर्शन घेतो. त्याप्रमाणे जनता हे आमचे दैवत आहे आणि दैवताच्या दर्शनासाठी मी राज्यभर महाजनादेश यात्रा करतोय. विरोधात असताना संघर्ष यात्रा आणि सत्तेत असताना जनसंवाद यात्रा काढण्याचे काम आम्ही केले आहे. काँग्रेस-'राष्ट्रवादी'ला पायचीत केले आहे. त्यांना जनतेच्या दारात जावे लागते, हे सत्ता गेल्यावर समजले हे बरे झाले.

"बारामती जिंकली की ईव्हीएम चांगली' आणि 'नगर व बीडमध्ये डॉ. सुजय विखे व प्रीतम मुंडे जिंकले की ईव्हीएममध्ये घोटाळा' असे विरोधी मंडळींबाबत बोलले जाते. तुम्हाला जनतेने हरविले आहे.''

राज्यावर खूप संकटे आली. दुष्काळ, अतिवृष्टी, बोंडअळी यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, विमा व अनुदान अशा उपाययोजना केल्या. पावणेतीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आणखीही ही योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये मदत म्हणून पन्नास हजार कोटी रुपये दिले. सिंचनाच्या योजनांना व जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार योजनेला मोठा निधी दिला. पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून 167 टीएमसी पाणी मराठवाडा न पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देऊ. शेवगाव पाथर्डी शहराच्या पिण्याच्या पाणी योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देऊन तीस हजार किलोमीटरचे रस्ते पाच वर्षांत तयार केले. गरिबांनाला घरे देण्याचे काम केले. पुढील तीन वर्षांत एकही माणूस बेघर राहणार नाही. अतिक्रमणे नियमित करून मालकी हक्क दिले आहेत. ऊसतोड महामंडळाकडून पुढील काळात तोडणी कामगारांना घरे देण्याचे काम करू. तोडणी कामगारांच्या मुलांसाठी पाथर्डी वसतिगृह बांधायला निधी देऊ, शैक्षणिक सुविधा पुरवू, अशी आश्‍वासने मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
आमदार मोनिका राजळे यांनी प्रस्ताविक करून पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील दुष्काळी जनतेच्या शेतीला पाटाचे पाणी द्यावे व ताजनापूर योजनेला दीडशे कोटींचा निधी देण्याची मागणी केली.

'मुंडे यांचे बोट धरूनच राजकारणात...'
लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार दिवंगत राजीव राजळे यांची आठवण काढत मुख्यमंत्री म्हणाले, की पाथर्डीत आल्यावर दोघांची आठवण मला येते. स्वर्गीय मुंडे यांचे पाथर्डी तालुक्‍यावर विशेष प्रेम होते. मुंडेंच्या बोटाला धरूनच आम्ही राजकारणात आलो. त्यांनी आम्हाला संघर्षाची शिकवण दिली. माझे मित्र स्वर्गीय राजीव राजळे यांची आठवण मनाला वेदना देते.

दरम्यान, "आमदार मोनिका राजळे, रामभाऊ शिंदे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, पिचड, पाचपुते यांना जनतेचा आशीर्वाद आहे का?' अशी विचारणा फडणवीस यांनी केली. या वेळी हात उंचावून व "हो' म्हणत उपस्थितांनी प्रतिसाद दिला आहे. खासदार डॉ. सुजय विखे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनाही आशीर्वाद असल्याचे पाथर्डीकरांनी हात उंचावून सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com