सावधान... बनावट दस्तनोंदणी करणारी टोळी सक्रिय; सांगली जिल्ह्यात दीड वर्षात पाच प्रकार

Caution ... Fake document registration gang active; Five incidents in a year and a half in Sangli district
Caution ... Fake document registration gang active; Five incidents in a year and a half in Sangli district

सांगली : कुपवाडमधील भूखंडाच्या बनावट दस्त नोंदणीचा प्रकार नोंदणी अधिकाऱ्यांच्या सतर्कमुळे शुक्रवारी उधळला. मात्र गेल्या दीड वर्षात महापालिका क्षेत्रात असे पाच प्रकार उघडकीस आले आहे. नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेत बनावट ओळखपत्रांच्या आधारे फसवणूक करणारे टोळके महापालिका क्षेत्रात कार्यरत आहे. 

महापालिका क्षेत्रात विशेषतः उपनगरांमध्ये, गुंठेवारी भागात हजारो भूखंड पडून आहेत. केवळ कुंपण ठोकून वर्षानुवर्षे मालमत्ताधारक तिकडे फिरकतच नाहीत. ते नेमके हेरून दलाल मंडळी स्थानिकांना हाताशी धरत, असे प्रकार करताना आढळले आहेत. नोंदणी कार्यालयात खरेदीदार-विक्रेत्याचे आणि ओळख पटवणाऱ्यांची फक्त आधार कार्डच पाहिले जाते. मात्र ही कार्डेच खरी की खोटी हे ओळखण्यासाठी "आधार'ची आवश्‍यक असणारी लिंक नोंदणी कार्यालयांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे खरेदी व्यवहारासाठी असलेले आधार अनिवार्य केले, तरी त्याचा खातरजमा करता येत नसल्याने, त्याचा काहीच उपयोग होत नाही. नोंदणी कार्यालय राज्य शासनाला दरवर्षी 36 हजार कोटीं महसूल मिळवून देते, मात्र या कार्यालयाच्या अद्ययावतीकरणासाठी ठोस पाऊले मात्र उचलली जात नाही. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील काही नोंदणी कार्यालयात आधारची लिंक सुरू झाली, मात्र आधारची खातरजमा करण्यासाठीची प्रक्रियेस उशीर होत असल्याने तो प्रकल्पच बारगळला. 


वस्तुतः "आधार'चा हेतूच मुळी व्यक्तीची एकमेवाद्वितीय असलेली जैविक ओळख पटवणे हा आहे. अंगठ्याचा ठसा आणि डोळ्यातील बुबळे यात बनावटगिरी अशक्‍य आहे. प्रत्येक मालमत्तेला आधार क्रमांक जोडण्याचा शासनाचा प्रकल्पही रेंगाळला आहे. सर्वत्र आधारची सक्ती होत गेली. मात्र जिथे व्यक्तीच्या जीवनभराच्या मिळकतीचा संबंध आहे, तिथे आधार क्रमांक जोडण्याचा आग्रह आधारची व्यवस्था सुरू होऊन तप उलटले तरी झालेली नाही. 


कायदा काय सांगतो? 

  •  नोंदणी कायदा 1908 मधील नियम अटी -41 (2)नुसार दस्त नोंदणी व्यवहारात कलम 55 अन्वये खरेदीदारावर सर्व काही जबाबदारी निश्‍चित केली आहे. 
  •  कोणत्याही मालमत्तेचा 13 ते 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट घेणे ही जबाबदारी खरेदीदारांचीच आहे. 
  •  नोंदणी अधिकाऱ्याने खरेदीदार व विक्रेत्याला ओळखणाऱ्या दोन ओळखदारांकडून फक्त कबुलीनामा लिहून घ्यायचा आहे. 
  •  मालमत्तेचा मूळ मालक कोण हे तपासण्याची जबाबदारी कायद्याने नोंदणी अधिकाऱ्यावर नाही. 


मालमत्ताधारकांकडून फिर्याद हवी 
मागील दीड वर्षात जिल्ह्यात बनावट दस्त नोंदणीचे कुपवाड, जत, सांगलीमध्ये प्रत्येकी एक तर मिरजेत तीन असे प्रकार उघडकीस आले. नोंदणी अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे असे प्रकार उघडकीस आले असले; तरी त्यांच्या नजरेतून सुटून असे अनेक प्रकार घडलेले असू शकतात. अशा प्रकारात नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतःहून फिर्यादी दाखल केल्या असल्या, तरी जिथे दस्त नोंदणी झाली आहे, अशा प्रकरणात मालमत्ताधारकांनी दस्त झालेल्या नोंदणी कार्यालयाकडे तक्रारी केल्यास पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करणे सुलभ होते. 

आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली पाहिजे
मालमत्ताधारकांनी आपले प्रॉपटीकार्ड उतारे आणि सात-बारा उताऱ्यांवरील नोंदीत काही बदल झालेले आहेत का याची खातरजमा नियमितपणे उतारे काढून केली पाहिजे. लग्नाइतक्‍याच दक्षतेने मालमत्तेच्या जागेच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली पाहिजे. विक्री करणाऱ्याची ओळख पटवणारी एकापेक्षा अधिक कागदपत्रे पाहिली पाहिजेत. खरेदी व्यवहाराआधी मालमत्तेचा सर्च रिपोर्ट घेतला पाहिजे. खरेदीनंतर महिनाभरात सिटी सर्व्हे किंवा सात-बारा उताऱ्यावर नोंदी करून घेतल्या पाहिजेत. 
- साहेबराव दुतोंडे, सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा जिल्हा मुद्रांक अधिकारी 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com