.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तात्या लांडगे
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे दौंडवरून सध्या उजनी धरणात १८ हजार क्युसेकची आवक सुरू आहे. पण खडकवासला, गोड व चासकमान या धरणांतूनही पाणी सोडण्यात आले असून, धरण परिसरातील पावसाचाही विसर्ग जास्त आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सायंकाळी पाचनंतर उजनी धरणातील आवक ५० हजार क्युसेकपर्यंत होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खडकवासला धरणातून सध्या आठ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे; पण पावसाचा अंदाज घेऊन तो विसर्ग २० हजारांपर्यंत वाढविला जाणार असून, तसा अलर्ट देण्यात आला आहे. गोड धरणातूनही चार हजार क्युसेकचा विसर्ग सोडला असून, या धरणांच्या परिसरातील पावसाचाही विसर्ग दौंडकडे येत आहे. चासकमान (भीमाशंकर) धरणातूनही २५ हजारांचा विसर्ग दौंडकडे येत आहे.
दौंडवरून उजनी धरणात पाणी यायला १४ तास लागतात. त्यामुळे दुपारी एक-दोननंतर उजनीत येणारा विसर्ग वाढून ५० हजारांपेक्षा जास्त होईल. त्यामुळे शनिवारी किंवा रविवारी धरण ७५ टक्के भरणार आहे. त्यानंतर धरणातील पाणी नदीतून सोडून द्यावे लागेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या उजनी धरण ६४ टक्के भरले असून, धरणात रात्री उशिरापर्यंत दौंडवरून १८ हजार क्युसेकची आवक सुरू होती.
६ जुलैला वारी; नदी पात्रात राहणार जास्त पाणी
यंदाच्या आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला रंगणार आहे. सध्या चंद्रभागा नदीत पाणी असून धरण ७५ टक्के साठा झाल्यावर धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पंढरपूरजवळ नदीपात्रातील विसर्ग २० ते २५ हजार क्युसेकपर्यंत राहू शकतो, पण ते सगळे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्यांदाच जून महिन्यात अशी स्थिती उद्भवल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.