सकाळ वृत्तसेवा
अकोले : ""महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे,'' असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ""पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. भविष्यात त्यांना विरोधी पक्षनेताही निवडून आणता येणार नाही,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज जिल्ह्यातील अकोल्यापासून सुरवात झाली. या वेळी आयटीआय मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, माजी आमदार वैभव पिचड, आमदार सुरजितसिंग ठाकूर, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, हेमलता पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, शिवाजी धुमाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ""मला पत्रकार विचारतात, की यात्रा देव-दैवतांच्या असतात, मग ही यात्रा कशी? महाराष्ट्रातील मायबाप जनता हीच खरे दैवत आहे. त्यामुळे या जनतेमध्ये जाऊन, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे. आमच्यानंतर राष्ट्रवादी व कॉंग्रेसवाल्यांनी यात्रा काढल्या. आमच्या यात्रेला मैदाने पुरत नाहीत, त्यांना मंगल कार्यालयात कार्यक्रम घ्यावा लागतो.''
""राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ज्यांचे नाव व कार्य आहे, असे ज्येष्ठ माजी मंत्री मधुकरराव पिचड व पाच वर्षे आमच्याबरोबर विधानसभेत शांत राहून अभ्यासपूर्ण मुद्दे, तालुक्याचे प्रश्न मांडून आपल्या पदरात काही तरी पाडून घेणारे अभ्यासू आमदार वैभव पिचड भाजपमध्ये आलेत, याचा मनस्वी आनंद आहे,'' अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.
प्रत्येकाला मिळेल घर
राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. महाराष्ट्र धूरमुक्त, चूलमुक्त करणार आहोत. अकोले तालुक्यात येत्या दोन वर्षांत सर्व रस्ते चांगले झालेले असतील, तसेच एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, असे आश्वासन देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैभव पिचड यांना जनतेचा जनादेश असल्याने ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. |
|