‘चाईल्ड लाईन’ने रोखले २९ बालविवाह

‘चाईल्ड लाईन’ने रोखले २९ बालविवाह

कोल्हापूर - मॅडम, मला शिकायचंय... एक मुलगा मला त्रास देतोय... म्हणून मम्मी-पप्पा मला शाळेत पाठवायला तयार होत नाहीत. त्यांना माझे लग्न लावायचे आहे... खूप भीती वाटतेय मॅडम... अशा प्रकारचा फोन चाईल्ड लाईनला येतो. आणि मग सुरू होतात प्रयत्न, त्या मुलीला या परिस्थितीतून काढण्याचे. जिल्ह्यातील गेल्या वर्षभरात असे २९ बालविवाह होण्यापासून ‘चाईल्ड लाईन’ या स्वयंसेवी संस्थेने रोखले आहेत. 

बालकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी चाईल्ड लाईनकडून शाळांमध्ये जनजागृती केली जाते. २४ तास उपलब्ध असणाऱ्या या हेल्पलाईनची जाहिरातही केली जाते. तरीही भीतीपोटी बालक किंवा लोकांकडून त्याची माहिती चाईल्ड लाईनला कळवली जात नाही. त्यामुळे अजूनही काही बालक संकटाच्या छायेत वावरत आहेत. यासंदर्भातील माहिती नि:संकोचपणे चाईल्ड लाईनला कळवल्यानंतर कित्येक बालक या समस्येतून निश्‍चितच बाहेर पडू शकतील. 

१०९८ टोल फ्री नंबर असणारी चाईल्ड लाईन लहान मुलांना अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य करते. संकटात सापडलेल्या बालकांना आधार देऊन पुनर्वसन करण्याचे काम चाईल्ड लाईनच्या माध्यमातून केले जाते. अनाथ, निराधार, भरकटलेले, शारीरिक लैंगिक शोषणास बळी पडलेले, कौटुंबिक कलहास बळी पडलेले बालक, बालमजूर, बालभिक्षेकरी, बालविवाह अशा परिस्थितीत असणाऱ्या बालकांची सुटका माहिती मिळाल्यानंतर तत्परतेने केली जाते. 

एखाद्या संकटात सापडलेल्या बालकाने किंवा त्याच्या वतीने एखाद्या व्यक्तीने हेल्पलाईनला संपर्क साधल्यानंतर त्या बालकाला संकटातून मुक्त करण्यासाठी चाईल्ड लाईनची टीम त्या ठिकाणी पोहचते. बालकाला भावनिक आधार देते. त्याच्या समस्येची पूर्ण माहिती घेऊन गरज असल्यास सुरक्षित ठिकाणी पोहचवते. त्यानंतर बाल कल्याण समितीसमोर पालक किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीला उभे केले जाते. यातून त्यांचे समुपदेशन करून त्या समस्येवर उपाय शोधला जातो. 

चाईल्ड लाईनची मदत झालेल्या बालकांची संख्या 
(कोल्हापूर जिल्हा आकडेवारी जानेवारी २०१८ ते ऑक्‍टोबर २०१८)
 निवाऱ्याची गरज असणारी  - ३६
 शालेय साहित्य व पौष्टिक आहाराची गरज असणारी - ५२
 हरवलेली, सापडलेली  - २७
 भावनिक आधाराची गरज असणारी - १९
 शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचारातून सोडवणूक - ४६
 बालमजुरीतून मुक्त - ३५
 बालविवाह -२९
 भीक मागणारी -२१

संकटात असणाऱ्या मुलाला सोडविण्यासाठी खूप लोकांची इच्छा असते; पण नको त्या चौकशा मागे लागतील या कारणाने चाईल्ड लाईनला कळवले जात नाही; पण अशा प्रकारची माहिती दिली, तर नाव गुप्त ठेवले जाते. त्यामुळे निर्धास्तपणे चाईल्ड लाईनला कळवले तर त्या बालकाची त्या समस्येतून सुटका होऊ शकते. 
- अनुजा खुरंदळ
, समन्वयक, चाईल्ड लाईन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com