मुख्यमंत्री गरिबांना भेटलेच नाहीत; उच्चभ्रू पूरग्रस्तांची विचारपूस (व्हिडिओ)

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कच्छी जैन भवनमध्ये पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली, मात्र त्यांची ही भेट आता वादात सापडली आहे. त्यांनी कच्छीच्या दुसऱ्या मजल्यावर जात उच्चभ्रू व्यापारी, उद्योजकांच्या कुटुंबाची चौकशी केली, मात्र तळमजल्यावरील गोरगरिबांना ते भेटलेच नाहीत. या प्रकारावर पूरग्रस्तांनी तीव्र संताप व्यक्त करत आमची सरकारला कदर नाही काय? गरिब तुम्हाला दिसत नाहीत का , असा सवाल केला आहे. 

मुख्यमंत्री आज अचानकपणे सांगली दौऱ्यावर आले. आधी त्यांनी हिराबाग कॉर्नर येथे पूरपरिस्थिती आणि लोकांची सुटका करण्याच्या मोहिमेची माहिती घेतली. तेथेही लोकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. यंत्रणेबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत लोकांनी प्रशासनाकडून खूप दिरंगाई झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेथून ते कच्छा जैन भवनमध्ये आले. सोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख होते. नियोजनानुसार, मुख्यमंत्र्यांना तळमजल्यावरील गोरगरीब पूरग्रस्तांना भेटायचे होते. त्यानुसार तयारीही होती. सारे पूरग्रस्त आपापल्या जागी बसवले गेले होते. वैद्यकीय सेवेचे टेबल नीटनेटके केले होते. आत स्वयंपाक घरालाही ते भेट देणार होते. पोलिसांनी दोन्ही बाजूची गर्दी हटवून पक्का बंदोबस्त ठेवला होता. 

मुख्यमंत्री गाडीतून उतरले आणि थेट त्यांनी वरच्या मजल्याची पायरी गाठली. तेथे त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले, त्यावेळी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा मुख्यमंत्र्यांनी वाट चुकली आहे, आपणास खालच्या मजल्यावर जायचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करत होते. ते कुणी ऐकले नाही आणि थेट पहिल्या मजल्यावरील हाय-फाय सोयी असलेल्या पूरग्रस्तांना ते भेटले. अर्थात, व्यापाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबियांची सोय केली आहे, त्याबद्दल कुणाला आक्षेपही नाही, मात्र मुख्यमंत्र्यांना तेथे नेले कुणी? याचा उलगडा झालेला नाही. मुख्यमंत्री आता येतील, मग येतील म्हणून लोक खालच्या मजल्यावर प्रतीक्षा करत राहिले. ते काही आलेच नाहीत. शिवसेनेचे नेते दिगंबर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना अजून खालच्या मजल्यावर जायचे आहे, असे सांगितले, मात्र त्याकडेही त्यांनी लक्ष दिले नाही. ते निघून गेले आणि लोकांच्या संयमाचा बांध फुटला. 

संगीता चव्हाण आणि सुवर्णा गवळी या महिलांनी साऱ्यांच्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या. त्या म्हणाल्या, आम्हा गरिबांना विचारलेच नाही. आमचा संसार बुडालाय. पाण्यात गेलाय. त्यांचे कर्तव्य नव्हते का? गरिबांना भेटायला आलाय की बड्यांना. जनतेला घाबरला का तुम्ही? एकदा तरी चौकशी करायची? आम्ही काय नेत्यांना मारणार होतो का? अंगावरच्या एकेका कपड्यावर आलोय आम्ही. संसार सारा वाहून गेलाय. तुम्ही भेटणारच नव्हता तर आला होता कशाला? 

सुवर्णा जिरंगे म्हणाल्या, पाणी कुठेपर्यंत येणार हे लोकांना सांगितले गेले नाही. त्यामुळे ही अडचण झाली. आम्ही त्यांना हे सांगणार होतो. आता काय उपयोग. या स्थितीत आमचा संसार उभा करून दिला पाहिजे. कच्छी जैन भवनने आमची संपूर्ण सोय केली आहे. 

एस.पी. ओरडले, कुणी नाही ऐकले 
पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी मुख्यमंत्री वरच्या मजल्यावर जात असताना ओरडून सर, लेफ्ट-लेफ्ट (डावीकडे) असे सांगितले, मात्र त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख हेही सोबत होते. खासदार संजय पाटील यांनीही नियोजनातील गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली. 

सर्व उत्तम सोय, बिसलरीचे पाणी 
मुख्यमंत्री ज्यांना भेटलो, त्या लोकांनी आपली सारी उत्तम सोय झाल्याचे त्यांना सांगितले. आम्ही बिसलरीचे पाणी पितोय, हेही आवर्जून नमूद केले. आता मुख्यमंत्र्यांनी हेच वास्तव आहे, असे समजू नये म्हणजे झाले, असा टोला खालच्या मजल्यावर राहिलेल्या पूरग्रस्तांनी लगावला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com