इस्लामपूर (जि. सांगली) : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील पाटबंधारे विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या तलावातून शेतात पाणी पाजण्यासाठी होत असलेली पाण्याच्या व विजेच्या चोरीसंदर्भात येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रशासनाला तक्रार दिली आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
रेठरे धरण शिराळा रस्त्यावर सदर पाझर तलाव असून या तलावामधून रेठरे धरण या गावास पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस व मे महिना असून तलावातील पाणी पातळी एकदम कमी झाली आहे. पाणी कमी झाल्याने ते गढूळ बनले असून मागील चार दिवसात तलावामधून पाणी उपसणारी मोटर जळाली होती. गावास पाणी नव्हते. तेव्हा काही ग्रामस्थ तलावाजवळ गेले असताना या तलावात येथील सरपंच लता पाटील यांचे पती दादासो पाटील यांनी बेकायदेशीरपणे मोटर टाकून तलावाच्या खालील बाजूस असणाऱ्या आपल्या विहिरीत पाणी सोडल्याचे आढळून आले.
माजी सरपंच सुदाम पाटील, डी. के. पाटील, अमोल पाटील, संजय घोरपडे, उपसरपंच मदन पाटील, माजी उपसरपंच तानाजी पवार, अजित पाटील, इंद्रजित पाटील यांनी तलावाजवळ जाऊन ही पाणी व वीज चोरी पकडली व याबाबत सर्व गावात माहिती दिली. गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना तलावातील पाण्याची व लाईटची चोरी होत असल्यामुळे गावातील लोक संतप्त झाले आहेत. याबाबत वाळवा तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना या पाण्याच्या चोरीबाबत कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. सांगली जिल्हा परिषदेचे अधिकारी गुडडेवार यांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाला निवेदन प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
- शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा पंचायत समिती
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.