31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार तपोवन रस्त्याचे काम!

31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार  तपोवन रस्त्याचे काम!

नगर : बहुचर्चित, वादग्रस्त आणि कायमच विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या तपोवन रस्त्याचे काम येत्या 31 डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. माहिती अधिकारात वकील सुधीर टोकेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर मिळालेल्या या उत्तराने हसावे की रडावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीअगोदर रस्त्यावर अंथरलेल्या खडीवर अजून पुढील प्रक्रियाच सुरू करता न आलेल्या यंत्रणेला आता 31 डिसेंबरपर्यंत हे काम कसे पूर्ण करता येईल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे, हे मात्र नक्की! 

साडेचार किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित तपोवन रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी जुलै 2018मध्ये पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेतून अंतिमत: या रस्त्याच्या कामाचा ठेका नगरमधील ठेकेदार आर. एच. दरे यांना मिळाला. त्यांना एक जानेवारी 2019 रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला. रस्त्याचे काम पुढील बारा महिन्यांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार रस्त्याचे काम 31 डिसेंबर 2019पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

तथापि, रस्त्याच्या कामाला अजिबात उरक नसल्याने, हे काम कधी पूर्ण होईल, असा त्या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा रोजचाच प्रश्‍न आहे. त्यावरून ऍड. टोकेकर यांनी या संदर्भात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडे लेखी विचारणा केली होती. त्यात त्यांना उत्तरादाखल अधिकाऱ्यांनी, हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे उत्तर दिले आहे. यातून अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड होतो. कामाची वस्तुस्थिती माहीत नसताना, केवळ कागदांवरच खेळ करणाऱ्या अशा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या कामाविषयी नगरकर संताप व्यक्त करीत आहेत. 

निविदेतील मूळ कामाची रक्कम : 2 कोटी 74 लाख 
निविदेतील मूळ कामाची रक्कम : 2 कोटी 92 लाख 
काम पूर्ण करण्याचा कालावधी : 12 महिने 
कार्यारंभ आदेशाची तारीख : 1 जानेवारी 2019 
देखभाल- दुरुस्तीचा कालावधी : पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर पाच वर्षे 

अनेकांना पाठदुखीचा त्रास 
तपोवन रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. तथापि, यंत्रणा त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहत नाही. या प्रश्‍नात आमदार संग्राम जगताप, खासदार डॉ. सुजय विखे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. 
- ऍड. सुधीर टोकेकर, जिल्हा सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नगर 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com