
सीमाप्रश्नी चर्चेसाठी वेळ द्यावा
बेळगाव - सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर मध्यवर्ती समितीच्या वतीने शुक्रवारी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवण्यात आले आहे.
तसेच शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये तुम्ही सीमाप्रश्न सुटावा यासाठी तुरुंगवास भोगला आहे. तसेच आपल्याला या प्रश्नाची पूर्ण जाणीव असून, तुम्ही सीमावासीयांसाठी एक आशास्थान आहात. त्यामुळे सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी, याकरिता आपण चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती समितीला वेळ द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हे पत्र पाठविले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिंदे यांनी सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे मध्यवर्ती समितीकडून त्यांच्याकडे याबाबतही काही आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील व सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा समितीकडून व्यक्त केली जात आहे.
Web Title: Congratulations To Maharashtra Chief Minister Shinde From The Central Committee Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..