
इस्लामपूर : येथील कोळी मळा परिसरातील विवाहिता राजनंदिनी सरनोबत यांचा काल विहिरीत बुडून झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू नसून तो खून असल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी (ता. १८) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. काल रात्री उशिरा राजनंदिनीचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय २९, रा. कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
राजनंदिनी यांच्या माहेरचे नातेवाईक मिलिंद नानासो सावंत (वय २८, रा. रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कौस्तुभ याला आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ३१ मार्च २०१५ ला राजनंदिनी यांचे कौस्तुभ सरनोबतशी लग्न झाले होते. राजनंदिनी यांना राजलक्ष्मी (वय ७ वर्षे) व संयोगीता (वय ६ महिने) या दोन्ही मुलीच झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. या रागातून कौस्तुभ सतत त्रास देत होता. लग्नात झालेला ३४ हजार रुपयांचा खर्च न दिल्याचाही राग त्याच्या डोक्यात होता. राजनंदिनीने शिवणकाम करून त्यातील रक्कम फेडली होती. पती कौस्तुभ काहीही कामधंदा न करता घरीच असे. काम करण्यावरून पत्नी बोलल्यास तो तिला शिवीगाळ व मारहाण करत असे. शनिवारी (१७) रात्री पावणे ९ च्या सुमारास राजनंदिनी यांना आईचा फोन आला, त्यावरूनही कौस्तुभने त्यांना त्रास दिला. स्पीकर फोन सुरूच राहिल्याने माहेरच्या लोकांनी हा त्रास ऐकला होता. रविवारी (ता. १८) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाण्याचा बहाणा करत कौस्तुभ पत्नीला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्याच्या दिशेने घेऊन गेला. कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या संदीप पाटील व विनायक पाटील यांच्या सामायिक मालकीच्या विहिरीत राजनंदिनी यांना ढकलून दिले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
काल पोलिसांत माहिती देताना मात्र हा मृत्यू लघुशंकेसाठी विहीर परिसरात गेल्यानंतर पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे कौस्तुभ याने सांगितले होते. राजनंदिनी यांच्या नातेवाइकांनी मात्र हा घातपात असल्याची शंका व्यक्त करत पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी कालपासूनच लावून धरली होती. उत्तरीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
कौस्तुभच्या कृत्याबद्दल संतापाची भावना
राजनंदिनी ही कधीही सकाळी फिरायला जात नव्हती. घटना घरापासून दोन किलोमीटर अंतरावर खराब व निर्जन रस्त्यावर घडली. चालण्यासाठी जायचेच होते तर घराशेजारीच एका शाळेचे मोठे मैदान होते, तिथे का गेले नाहीत? ज्या विहिरीजवळ घटना घडली, त्याशेजारीच कौस्तुभच्या चपला पडल्या आहेत. त्याच्या शर्टवर मळल्याच्या खुणा आहेत. उजव्या हाताच्या दंडाला खरचटले आहे, असे अनेक मुद्दे राजनंदिनी यांचा फिर्यादी नातेवाईक मिलिंद यांनी उपस्थित केले आहेत. संशयित कौस्तुभ हा शिक्षक दाम्पत्याचा मुलगा आहे आणि त्याची सख्खी बहीण पोलिस खात्यात नोकरीस आहे. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही कौस्तुभच्या अशा कृत्याबद्दल संतापाची भावना आणि दोन लहान मुलींना आलेल्या पोरकेपणाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.