
कडेगाव (जि. सांगली ) : जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनातून पुणे, मुंबई या कोरोना हायरिस्क झोन मधून राज्यातील विविध ग्रामीण भागात विना परवाना प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने ""कोरोना वाहक'' बनण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हा जीवनावश्यक वस्तुंच्या वाहनातून विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व वाहन चालकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने कोरोनाचा संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी सर्वत्र सुमारे गेल्या दीड महिन्यापासून लॉक डाऊन व संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच आंतर जिल्हाबंदीही केली आहे. तर पुणे, मुंबई सारख्या हाय रिस्क झोनमधून कोणीही बाहेर पडू नये किंवा गावाकडे येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा रीतीने शासनाने लॉक डाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने बऱ्यापैकी कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले. परंतु लॉक डाऊनच्या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये व गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे ग्रामीण भागातून भाजीपालासह अन्य जीवनावश्यक वस्तू पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यात नेण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री मोठ्या शहरांत करता येऊ लागली. तर पुणे, मुंबई सारख्या शहरातील नागरिकांना भाजीपालासह अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होऊ लागल्याने दिलासा मिळाला.
परंतु भाजीपाला वाहतुकीला शासनाने परवानगी देण्याचा चांगला निर्णय घेतला असला तरी त्याचा संबंधित वाहन चालकांनी मात्र आपल्या आर्थिक फायद्यासाठी चांगलाच गैरफायदा घ्यायला सुरवात केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातून पुणे, मुंबई सारख्या हाय रिस्क भागात भाजीपाला घेऊन गेलेली वाहने परत गावाकडे येताना मात्र तेथील आपल्या भागांतील लोकांना बेकायदापणे गावाकडे घेऊन येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तर वाहनांवर पुढे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक असा फलक लावलेला असल्याने पोलिसांकडूनही या वाहनांची तपासणी केली जात नाही. तेव्हा पोलिस प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनाचीही कसून तपासणी करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे अन्यथा जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने ""कोरोना वाहक'' बनली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको.
तपासणी का नाही झाली ?
कोतीज (ता. कडेगाव) येथील मुंबईस्थित पंचावन्न वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीच्या दोन मुली, भाऊ, भावजय व पुतणी अशा एकूण पाच व्यक्ती मुंबई सारख्या हाय रिस्क झोनमधून कोतीज येथे भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनातून विना परवाना आल्याचे उघडकीस आले आहे. तर सदर वाहन जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारे असल्याने या वाहनाला पोलिसांनी मुंबई ते कोतीज कुठेही अडवले नाही. त्यामुळे कडेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर अशी अनेक कुटुंबे कोरोनाच्या हाय रिस्क झोन मधून जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनातून पोलिसांना गुंगारा देऊन राज्यातील विविध ग्रामीण भागात दाखल होत आहेत. ही चिंतेची बाब आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.