जिल्ह्यात शुक्रवारपासून मोफत तांदूळ वाटप

rice.JPG
rice.JPG

सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून एक ते सहा एप्रिल सहा दिवसांत जिल्ह्यातील तीन लाख दोन हजार (3.02 लाख) शिधापत्रिका धारकांना तब्बल 7240 टन अन्नधान्य 77.22 टक्के कार्डधारकांना वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे यांनी दिली. शुक्रवारपासून (ता. 10) मोफत तांदळाचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. 


जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही शिधापत्रिकांमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे तीन लाख 92 हजार आहे. या लाभार्थ्यांना 1356 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यामध्ये 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 23 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदूळ दिला जातो, त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. 
प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु. किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो. 


सांगली जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजना या दोन योजनांमधून सुमारे 4393 टन गहू, 2847 टन तांदूळ, तर 2928 क्विंटल डाळींचे वाटप पॉस मशीनवरून करण्यात आलेले आहे. अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना 210 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेल्या सुमारे 3497 शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. 


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ 10 एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेकरिता भारतीय खाद्य निगम कडून 9200 टन तांदळाचे नियतन प्राप्त करून घेतले आहे. 
 

जिल्ह्यात जीवनावश्‍यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलिसांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com