संतप्त शेतकऱ्यांनी "यांना' धरले धारेवर 

Enrage farmer
Enrage farmer

सोलापूर : यंदाच्या कांद्याच्या विक्रमी दरात लासलगाव बाजार समितीलाही मागे टाकणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा रुद्रावतार बघायला मिळाला. शेतकऱ्यांच्या या संतापाचा सामना बाजार समितीचे सभापती तथा माजीमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांना करावा लागला. शेतकऱ्यांनी हल्लाबोल केल्यानंतर तब्बल अडीच तासाहून बंद पडलेला कांदा लिलाव अखेर दुपारच्या सुमारास सुरू झाला. 

सोलापूर बाजार समितीच्या इतिहास पहिल्यांदाच यंदा कांद्याचा दर 15 हजारांच्या पुढे गेल्याने देशात सोलापूर बाजार समिती चर्चेत आली होती. कांद्याच्या दराने चर्चेत आलेल्या या बाजार समितीमधील हमालांनी सुट्टीच्या मुद्‌द्‌यावरून तर व्यापाऱ्यांनी कांदा चोरीच्या मुद्‌द्‌यावरून आज सकाळपासूनच वेगळी भूमिका घेतली. कांदा चोरी रोखण्यात बाजार समितीला अपयश येत असल्याने कांद्याचे वजन रात्री करण्याऐवजी सकाळी लिलावाच्या नंतर करावे या मागणीसाठी खरेदीदार व्यापाऱ्यांनी आज अचानकपणे लिलाव बंद पाडले. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेचा निषेध करत थेट बाजार समिती आवारातच ठिय्या मारला. शेतकरी, हमाल आणि व्यापारी यांच्यात अभूतपूर्व गोंधळाचा सामना आज बाजार समिती प्रशासन व पदाधिकाऱ्यांना करावा लागला. 

बाजार समितीतील या गोंधळाची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनीही तातडीने बाजार समितीत धाव घेतली. व्यापारी व शेतकऱ्यांशी चर्चा केली पण तोडगा निघत नव्हता. शेवटी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची ही भूमिका हाणून पाडली आणि प्रशासनानेही चोऱ्या रोखण्याबाबत दक्षता घेऊच, पण लिलावाच्या आधीच कांद्याचे वजन होतील असे ठणकावून सांगितल्याने तूर्त यावर पडदा पडला आणि लिलावाला सुरवात झाली. 


जबाबदारी समितीची 
शेतकऱ्यांच्या दृष्टीने लिलाव आधीच वजन होणे कसे योग्य आहे, हे शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले. अनेकदा वजन पाहून दूरवरचे शेतकरी निघून जातात. लिलाव होईपर्यंत थांबणे, शेतकऱ्यांना शक्‍य नाही, याकडेही या वेळी लक्ष वेधण्यात आले. बाजार समिती आवारात कांदा आणल्यानंतर कांद्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित व्यापारी आणि बाजार समितीची आहे, त्यात शेतकऱ्यांचा दोष काय? उलट रात्र-रात्रभर अनेक शेतकरी स्वतःच स्वतःच्या कांद्याची राखण करत बसतो, हेही सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. 

चोरी रोखण्यासाठी उपाय योजना 
बाजार समितीच्या संपूर्ण आवाराला भिंतीचे कुंपण आहे. या आवारात जवळपास 70 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच मुख्य रस्त्यासह कांदा सेल हॉलमध्येही पुरेसे सुरक्षा रक्षक आहेत. सध्या काही कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात येते. पण कांद्याची चोरी नेमकी होते कशी? हा प्रश्‍न आहे. यामध्ये अधिक माहिती घेता, काही व्यापारी हमालांना हमालीच देत नाहीत, त्याऐवजी कांदा देतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यात बिगर नोंदणीकृत हमालांची संख्या अधिक आहे. हमालांना ओळखपत्र देण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com