
सध्याच्या कोरोना कालखंडात सारं जगच लॉकडाऊन झालंय. म्हणजे त्यातली माणसं. अवघ्या 21 दिवसात अनेकजण या बंदिस्त जगण्याने त्रस्त झाली आहेत. त्यातून ते नको ते धाडस करून घराबाहेर पडतात आणि स्वतःबरोबर कुटुंबाच्या जीवाशी खेळ करतात. त्यांच्यासाठी धीराचे चार शब्द सांगत आहेत स्वतःच गेली वीस वर्षे अपघाताने लॉकडाऊन असलेले कर्नाळ (ता.मिरज) येथील लेखक सचिन पाटील.
वीस वर्षांपूर्वी अपघातात मज्जारज्जूला जोराचा धक्का बसून दोन्ही पायातल्या संवेदना कायमच्या गेल्या. नऊ महिने मला उठून बसता येत नव्हतं. डॉक्टरांनी तुला कधीही चालता येणार नाही, कायमची व्हिलचेअर वापरावी लागेल किंवा कुणीतरी उचलून न्यावं लागेल, असं सांगितलं. सगळ्या क्रिया बेडवरच. या नऊ महिन्यात मरून पुन्हा जन्मलो.
या काळात तारलं ते पुस्तकांनी, बेडवर पडून मी कुठली-कुठली पुस्तकं वाचित राहायचो...
दोन वर्षांनंतर मी कुबडी घेऊन उभं राहायचा प्रयत्न केला. त्यात दोन-तीन वेळा पडलो-धडपडलो. मग नाद सोडून दिला. एका डॉक्टरांनी कॅलिपर बसवायचा सल्ला दिला. कॅलिपर लावून पाहिलं. पण त्यामुळे जखमा होऊ लागल्या. बॅलन्सही राहीना. मध्ये माझी दोन ऑपरेशनही झाली. त्यातून कुटुंबाच्या अर्थकारणचंही लॉकडाऊन झालं. वडीलही मानसिक आजाराने त्रस्त. आजारपणाने शिक्षण थांबलं. पण अवांतर वाचन सुरूच होतं... रात्रंदिवस...
मग जवळच्या मित्रांनी वॉकर आणून दिला. सुरुवातीला दोघांनी धरून उभं करावं लागे. ते ही पाच सेकंद, दहा सेकंद... मग बॅलन्स राहायचा नाही. फिजिओथेरपी, मॉलिश, प्राणायाम असे प्रयत्न भाऊ-सोबत्यांच्या मदतीने सुरु झाले. त्यात आणखी एक वर्ष गेलं. हळूहळू फरक पडत होता. आई म्हणायची, "कालच्यापेक्षा तू आज बरा आहेस... उद्या तुला चालायला यिल!' अंधारात काजवा लुकलुकल्यागत आशेचा किरण दिसत राही... मी वॉकरला धरून पंधरा-वीस मिनिटं उभं राहू लागलो. हळूहळू घरातल्या घरात पाय ओढत पावलं टाकू लागलो. मी माझ्या घरातून वॉकरसह पहिलं पाऊल बाहेर टाकलं ते तब्बल सहा वर्षांनी!
अंधारलेल्या दाही दिशांना झुंजूमुंजू झालेलं. अजून लख्ख उजाडलं नसलं तरी पायाखालची वाट दिसू लागलेली. तोवर धीर धरला. हा धीर दिला वाचलेल्या पुस्तकांनी. त्यातल्या महान, उत्तुंग व्यक्तिमत्वांनी. मित्रांनो. संकटकाळात पुस्तक तारतात.
आता वीस वर्षे लोटली. मी वॉकरला धरून पन्नास मीटर चालू शकतो. घरातल्या घरात पिठाची गिरणी सुरू केली आहे. माझ्या हालचालींना बऱ्याच मर्यादा आहेत. स्पायनल कॉर्डच्या गुंतागुंतीच्या तक्रारी आहेत. पाठीत धातूच्या पट्ट्या असल्यामुळे मी जास्त वेळ बसू शकत नाही. प्रवास झोपूनच करावा लागतो. सतत घरी असल्याने बाहेरचं वातावरणात लगेच आजारपण गाठतं. म्हणून जास्तीत जास्त वेळ घरीच असतो; कायमचा लॉकडाऊन. थोडंफार लिहितोही. त्यातून दोन पुस्तकं प्रकाशित झालीत. लेखणीमुळं अनेक मानसन्मान मिळाले.
आयुष्याबद्दल आपण थोडं लवचिक असायला हवं. निसर्गाच्या विरूद्ध वागताना विचार करायला हवा. अरेरावी तर अजिबात नको. येणाऱ्या संकटांना डोळसपणे सामारे जायला हवं. सध्याच्या संकटकाळात थोडा धीर धरा. चहात दूध नाही म्हणून किंवा ताटात अमुक भाजी नाही फार फरक पडत नाही. लॉकडाऊननंतरीह संकटं आहेतच. म्हणून मित्रांनो...धीर धरा. घरीच रहा. कोरोनाविरोधात संयमाने लढुयात !
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.