लाखमोलाचा शेतमाल कचराकुंडीत; रस्त्यावर फेकून देऊन अश्रू ढाळीतच त्यांना घर गाठावे लागले

लाखमोलाचा शेतमाल कचराकुंडीत; रस्त्यावर फेकून देऊन अश्रू ढाळीतच त्यांना घर गाठावे लागले

कऱ्हाड ः शेतकऱ्यांनी चार- सहा महिने घाम गाळून मोठ्या हिमतीने पिकवलेला भाजीपाला पदरमोड करून भाड्याने वाहनाने विक्रीसाठी बाजारात आणला. मात्र, लॉकडाउनमुळे त्यातील काही शेतमाल विकलाच गेला नाही. अगोदरच बाजारापर्यंत शेतमाल आणताना वाहनांसाठी झालेली पदरमोड भरून काढायची पंचायत असताना पुन्हा तो माल उचलून दुसरीकडे विक्रीसाठी नेणे शक्‍य नसल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल कचराकुंडीत, रस्त्यावर फेकून देऊन अश्रू ढाळीतच घर गाठावे लागले.

कोरोनाच्या महामारीत अनेकांवर गंडातर आले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. परिणामी सर्वच बंद राहिल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्या आर्थिक गर्तेत शेतकरीही सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांचा हंगाम असतो. या कालावधीत काकडी, कारले, कोबी, ढबू मिरची, गवारी, टोमॅटोसह पालेभाज्या आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. गावोगावच्या जत्रा- यात्रा, लग्न, उत्सव, सण असल्याने या कालावधीत त्याला मागणीही मोठी असते. त्यामुळे शेतकरी दर वर्षी तीन- चार महिने अगोदर कष्ट करून या हंगामात शेतमाल विक्रीसाठी आणण्यासाठी दिवसरात्र राबत असतात. त्यातून सध्या शेतमालही शेतात चांगला आला आहे. मात्र, त्याच्या विक्रीलाच ग्रहण लागले आहे.

सध्या लॉकडाउन असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना सरकारने शेतमाल विक्रीसाठी आणण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार शेतकरी पदरमोड करून भाड्याने वाहन करून शेतमाल विक्रीसाठी मार्केटला आणत आहेत. मात्र, तेथेही पहिल्यासारखी मागणी होत नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल विकला जाईलच याची खात्रीच नाही. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. "लॉकडाउन'मुळे विक्रीसाठी नेलेल्या मालापैकी सर्वच शेतमाल विकला जात नाही. त्यातच बाजारापर्यंत शेतमाल नेण्यासाठी भाड्याने वाहन करावे लागते. त्यासाठी केलेली पदरमोड अंगावर असताना तेथे माल खपला नाही म्हणून दुसऱ्या भाड्याच्या वाहनाने पुन्हा दुसरीकडे भाजीपाला नेणे शेतकऱ्यांना शक्‍य होत नाही. त्याचबरोबर शेतमाल एकदा विक्रीसाठी आणल्यावर तो नाशवंत असल्याने आणि सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने लगेचच खराब होत आहे. परिणामी मार्केटमध्ये आणलेला शेतमाल अनेक शेतकरी कचराकुंडीत, रस्त्यावर फेकून देऊन निराश होऊन घरी निघून जात आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. एक दिवसाआड अशी स्थिती होत असल्याने चार पैसे कमवायच्या वेळेतच "लॉकडाउन'चे ग्रहण लागल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला आहे.

मुक्‍या जनावरांच्या चाऱ्याची सोय 

शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल सर्वच विकला जात नाही. त्यामुळे काही जण तो कचराकुंडीत टाकून घराकडे जात आहेत. काही जण त्या परिसरातील रस्त्यावरच तो टाकत आहेत. त्यातच शहर व परिसरातील काही जनावरे, पाळी प्राण्यांना चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये भाजीपाला पडला आहे याची माहिती मिळाल्यावर ज्यांच्याकडे जनावरे आहेत, मात्र त्यांना चारा नाही, असे काही जण संबंधित ठिकाणावरून भाजीपाला भरून नेऊन जनावरांना घालत आहेत. त्यामुळे संबंधितांच्या जनावरांना चाऱ्याची तरी सोय होत आहे, ही एक जमेचीच बाजू आहे.

उद्धवजी, लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही...

Coronavirus : मुंबईतील सातारकरांनो घाबरु नका; कोरोनाचा संसर्ग राेखण्यास मदत करा
 

शेतकऱ्यांसाठी कोणीच वाली नाही अशी सद्यःस्थिती आहे. शेतकरी शेतमाल घेऊन गेल्यानंतर त्याचा माल विकला गेला पाहिजे, यासाठी शासनाने उपाययोजना करावी, तरच शेतकरी या संकटातून तरेल, अन्यथा त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येईल.

 शंकरराव खोत, कृषिभूषण शेतकरी, वाजेवाडी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com