
मिरज : करोना रोगाच्या संभाव्य संकटास अनुसरून महापालिकेने उरुसातील दुकाने आणि खेळण्यांना परवानगी नाकारली आहे. यावर्षीच्या उरुसात महापालिकेकडून अशा प्रकारे कोणतीही परवानगी देणे जाणार नसल्याचे आज शहर पोलिस ठाण्यातील एका बैठकीत स्पष्ट झाले. तहसीलदार रणजित देसाई, पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट सांगितले.
शहर पोलिस ठाण्यात मिरज येथील पारंपरिक उरुसाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडून आली. यावेळी कार्यकर्ते आणि दर्ग्याच्या भक्तांनी प्रशासनाने याबाबत थोडी सवलत द्यावी, अशी विनंती केली. परंतु उपस्थित अधिकाऱ्यांनी संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या, असे आवाहन करून लोकांसाठीच या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
यामध्ये उपायुक्त पाटील यांनी संपूर्ण देशभरातच आपत्कालीन स्थिती जाहीर झाल्यामुळे सर्वत्र जत्रा उरूस आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर केंद्र आणि राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे कुठल्याही दुकाने अथवा खेळण्यांना उरुसाच्या कालावधीत परवानगी दिली जाणार नाही. ज्या ठिकाणी गर्दी होईल अथवा लोक एकत्र येतील अशा ठिकाणच्या कुठल्याही दुकाने अथवा खेळण्यांना परवानगी देऊ नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
याबाबत महापालिकेने जरी जाहिरात प्रसिद्ध केली असली तरी ही जाहिरात रद्द झाल्याचेही प्रकटीकरण प्रसिद्धीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान तहसीलदार रणजित देसाई यांनी यामध्ये कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला निर्बंध नसल्याचे सांगितले. व्यक्तिगत पातळीवर दर्ग्यातील कार्यक्रमाबाबत कोणतेही निर्बंध सरकारने घातलेले नाहीत. त्यामुळे याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत. आपल्या ज्या सूचना असतील त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करण्याचे आश्वासन आपल्या दिले असले तरी गर्दी अधिक होणार नाही आणि त्याचा संभाव्य संसर्ग होऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनीही यामध्ये कोणत्याही प्रकारे धार्मिक भावनांचा प्रश्न येत नाही. प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या निर्णयाचे या आदेशांचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. महापालिकेच्या वतीने उपायुक्त स्मृती पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा प्रकारचे आदेश आले असल्याने महापालिकेने ही भूमिका घेतली आहे. "करोना'ची व्याप्ती वाढल्याने महापालिकेस निर्णय घेणे भाग पडत असल्याचे सांगितले.
दरम्यान या निर्णयाबाबत शांतता समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये दर्गा परिसरातील दुकानांना बंदी घालू नये अशी भूमिका घेतली. तर अन्य कार्यकर्त्यांनी महापालिकेने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी तपासणी केंद्रे आणि अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात असेही सुचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.