पूरसंरक्षक भिंत आचारसंहितेच्या कचाट्यात ?

पूरसंरक्षक भिंत आचारसंहितेच्या कचाट्यात ?

कऱ्हाड ः शहरातील पूरसंरक्षक भिंतीच्या कामास ऑगस्टअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार आहे. सुधारित कामास तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र, शासनाचा सार्वजनिक बांधकाम, तसेच पाटबंधारे विभागांची नवी दरसूची नुकतीच जाहीर झाल्याने निविदा प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. लांबणीवर पडणाऱ्या निविदा प्रक्रियेमुळे या कामाच्या मुहूर्ताला विधानसभा निवडणुकीच्या आचारसहिंतेचा अडसर येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 
शहराच्या पूर संरक्षणासाठी शासनाने पूर संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास नेण्याचा विडा उचलला आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात 2008 मध्ये मंजुरी मिळालेले कृष्णा पूल ते यशवंतराव चव्हाण समाधीच्या मागील बाजूपर्यंतच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले. गॅबियन पद्धतीने ही भिंती उभारण्यात आली. त्यानंतरच्या टप्प्यात समाधीच्या मागील बाजूपासून कोयना पुलापर्यंतच्या संरक्षक भिंतीच्या कामालाही मंजुरी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 2010 मध्ये कोयनेश्वर घाटानजीक मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र, त्या वेळी श्री. पवार यांनी संरक्षक भिंत गॅबियनऐवजी आरसीसीमध्ये करण्याचे सूचवले. भिंत गॅबियन, की आरसीसी यामुळे रखडलेल्या कामाला आजतागायत सुरवात झाली नाही. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापूराने कऱ्हाड शहरात पाणी शिरले. अनेक कुटुंबे स्थलांतरित करावी लागली. पालिका व तालुका प्रशासनाने तत्परता दाखवत पूरबाधितांना स्थलांतरित केले. मात्र, पूरसंरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असते, तर शहराला महापुराचा फटकाच बसला नसता, असे सांगून पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ऑगस्टअखेर कामाची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन भूमिपूजन होईल, असा पूरस्थितीची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधताना दावा केला. सहाजिकच विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा उठवता येण्याचे त्यामागचे कारण आहे. त्यादृष्टीने काही दिवसांपूर्वी सुधारित कामास तांत्रिक मान्यताही मिळाली. कऱ्हाड दक्षिणचे भाजपचे इच्छुक उमेदवार अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत त्याची माहितीही दिली. मात्र, राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाची नवी दरसूची नुकतीच जाहीर झाल्याने निविदा प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नव्या दरसूचीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने निविदा प्रक्रिया पुन्हा दहा सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे टांगती तलवार असलेल्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या कात्रीत ही प्रक्रिया अडकण्याची अधिक शक्‍यता आहे. आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचे भूमिपूजन करण्याच्या युती शासनाच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भिंतीच्या कामाचा मुहूर्त विधानसभा निवडणुकीनंतरच लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

कोनशीलेला जलसमाधी... 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीच्या मागील बाजूपासून कोयना पुलापर्यंत उभारण्यात येणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन 2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कोयनेश्वर घाटानजीक झाले. मात्र, नऊ वर्षे रखडलेल्या या कामाची कोनशीला या कामाची साक्ष अजून देत आहे. भूमिपूजनानंतर पहिल्यांदा यावर्षी आलेल्या महापुरात कोनशीलेलाही जलसमाधी मिळाली असून, त्याची दुरवस्था झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com