व्यापाऱ्यांनाे महापुरातील भरपाई मिळण्यासाठी 'हे' करा

व्यापाऱ्यांनाे महापुरातील भरपाई मिळण्यासाठी 'हे' करा

कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य नद्यांना आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाने नुकसानीच्या प्रमाणात चार हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.


जिल्ह्यात मध्यंतरी पाटण, महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड, जावळी व अन्य काही तालुक्‍यांत धुवाधार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये तर एका दिवसात पडलेल्या पावसाने जागतिक विक्रम केला. त्यामुळे कृष्णा-कोयना या मुख्य नद्यांसह अन्य उपनद्यांना महापूर आला. त्यातच जिल्ह्यातील धरणांतूनही पाणी सोडण्यात आल्याने नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडल्याने पाणी गावांत, बाजारपेठांत घुसले. अचानक एकाच रात्रीत मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांतील मालही हलवता आला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना अक्षरशः दुकानात माल तसाच ठेवून दुकान सोडावे लागले. महापूर ओसरल्यानंतर दुकानांच्या नुकसानीचे वास्तव समोर आले. त्यावेळी माल भिजून खराब झाला होता, दुकानांतील फर्निचर पाण्याने फुगून खराब झाले, यांसह अन्य मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले होते. कर्ज काढून सुरू केलेल्या व्यवसायात मोठे आर्थिक आरिष्ट आल्याने आता तो खर्च भागवायचा कशातून? हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता. नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंचनामे झाल्यानंतरही संबंधित दुकानदारांच्या नुकसानभरपाईबाबत स्पष्ट कोणताही आदेश नव्हता. त्यामुळे समस्त व्यापारी वर्ग हवालदिल झाले होते.

त्यासंदर्भात दैनिक "सकाळ'ने वास्तव मांडणारी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर आता व्यापाऱ्यांना भरपाईसंदर्भात शासनाकडून आदेश जारी झाला असून, नुकसानीच्या प्रमाणात पंचनाम्यानुसार शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रत्येकी 50 हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सध्या संबंधित तालुक्‍यांच्या तहसील कार्यालयामार्फत सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरलेल्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 

प्रशासनाचे आवाहन 

ज्या व्यापाऱ्यांचे महापुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. ज्यांचे पंचनामे झाले आहेत, त्यांनी नुकसानीच्या यादीतील नावांची खात्री करून तलाठी यांच्याकडून आधारकार्ड, बॅंक खात्याच्या पुस्तकाची झेरॉक्‍स प्रत जमा करावी, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com