शेवगाव : तालुक्यातील गोळेगाव पाझर तलावाची भिंत नव्याने बांधली तरच पूर्व भागातील अन्य गावांचा विकास विकास होऊ शकतो. त्यासाठी या परिसरातील गावांची एकजूट असणे गरजेचे आहे,'' असे मत जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी व्यक्त केले.
गोळेगाव (ता. शेवगाव) येथे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या, ग्रामपंचायत कार्यालय व श्रीक्षेत्र काशीकेदारेश्वर मंदिराच्या भक्तनिवास इमारत कामाच्या भूमिपूजनप्रसंगी काकडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रामभाऊ डमाळे होते.
या वेळी जनशक्ती मंचाचे संस्थापक ऍड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, संजय आंधळे, भाऊसाहेब सातपुते, सरपंच विजय साळवे, मुक्ता आंधळे, सुनील दौंड आदी उपस्थित होते.
काकडे म्हणाल्या, ""जिल्हा परिषदेत कमी निधी मिळत असला, तरी भरपूर विकासकामे आणण्याचा प्रयत्न केला. निविदा निघाल्याशिवाय मी कुठल्याच कामाचे भूमिपूजन करीत नाही. गेल्या चार पिढ्यांपासून सत्ता लोकप्रतिनिधींच्या घरात नांदत असताना कोणती विकासकामे केली?''
ऍड. काकडे म्हणाले, ""गावाच्या विकासासाठी सर्वांची एकी असणे गरजेचे आहे. आपल्यातील गट-तट बाजूला करून गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र यावे. गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत. तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी सत्ताधारी देऊ शकत नाहीत. केंद्रात, राज्यात त्यांचीच सत्ता आहे. विकासासाठी त्याचा काहीही उपयोग लोकप्रतिनिधींनी करून घेतला नाही. त्यांनी फक्त निष्ठावानांना संपविण्याचे काम केले.''
प्रास्ताविक संजय आंधळे यांनी केले. लक्ष्मण सानप यांनी आभार मानले.
|