
सांगली ः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. यामध्ये एपीएल केशरी रेशन कार्डधारकांसाठी जे राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीमध्ये येत नाहीत, ज्यांना दरमहा धान्य मिळत नाही, अशांसाठी राज्यशासनाने योजना सुरू केली आहे. मे आणि जून महिन्यामध्ये केशरी कार्डधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. 25 एप्रिल ते 4 मे या कालावधीत धान्य वितरित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी आज येथे दिली. ऑफलाईन पद्धतीने 10.18 लाख लोकांना धान्याचे वितरण होणार आहे. विशेष म्हणजे या कार्डधारकांना प्रथमच धान्य मिळत आहे.
जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांच्या मागण्यांबाबत 16 एप्रिल 2020 च्या अंकात "केशरी कार्ड ऑनलाईन असो वा नसो, सर्वांना धान्य द्या' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच 15 एप्रिल रोजी "ऑनलाईनअभावी फ्रिसेल धान्यापासून केशरी कार्डधारक राहणार वंचित' या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या संपर्कात सांगली शहरासह जिल्हाभरातून चौकशीसाठी फोन येत होता. दैनिक "सकाळ'कडेही याबाबत सातत्याने चौकशी केली जात होती. "सकाळ' आणि नागरिक कृती समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
रेशन दुकानदारांकडे केशरी कार्डधारक चौकशीसाठी गेले असता, त्यांना तुमचे कार्ड ऑनलाईन किंवा आधार लिंक नसल्याचे सांगितले जात होते. ऑफलाईन धान्य वाटपामुळे आता रेशनकार्ड, संबंधितांचा मोबाईल क्रमांक, व्यक्तीच्या प्रमाणात धान्याचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी एक छोटा फॉर्म भरून घेतला जाणार आहे. धान्य केवळ मे आणि जून दोन महिन्यांसाठी धान्य वितरित करण्यात येणार आहे. तीन किलो गहू 8 रुपये व दोन किलो तांदूळ 12 रुपये किलो दराने मिळणार आहे. एपीएल केशरीकार्डधारकांचे धान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, यामध्ये दुकानदार रजिस्टरमध्ये नोंदी ठेवतील. या धान्याचे वितरण पारदर्शी करण्यासाठी ग्रामीण स्तरावरील पुरवठ्याच्या दक्षता समितीने काटेकोर काळजी घ्यावयाची आहे.
पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे म्हणाल्या, ""रेशनिंगचे धान्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये एक मीटर अंतरावर दुकानांसमोर मार्किंग करण्यात आले आहे, त्याच ठिकाणी उभे राहावे, सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य असून, धान्य घेण्यासाठी येताना मास्क घालणेही अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.''
गरजूंना वर्षभर धान्यासाठी पाठपुरावा सुरूच
कोरोना पार्श्वभूमीवर केशरीकार्ड असलेल्या सर्वांना धान्यांची मागणीसाठी "सकाळ'सह नागरिक कृती समितीने पाठपुरावा केला. त्याला सरकार आणि जिल्हा प्रशासनाने सहकार्य केले. एप्रिल, मे आणि जून महिन्याचे धान्य मिळणे अपेक्षित होते, तरीही दोन महिन्यांचे धान्य देण्याचे जाहीर केले आहे. गरजूंना वर्षभर धान्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला जाईल.
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.