
कडेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांसह राज्यातील येथे अडकलेल्या मजुरांची उपासमार दूर करण्यासाठी तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यामुळे लॉक डाऊनच्या कालावधीत आपल्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, या चिंतेने ग्रासलेल्या तालुक्यातील मजूर व त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मात्र आता हास्य फुलले आहे.
तालुक्यात सध्या ताकारी, टेंभू योजनेचे अस्तरीकरण, तसेच गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच, येथील औद्योगिक वसाहतीतही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आहेत. तसेच, राज्यातील इतर भागातूनही मजूर मोठ्या संख्येने येथे रोजीरोटीसाठी आलेले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे येथील सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत; तर ताकारी टेंभू योजनेची विविध कामेही बंद झाली आहेत. त्यामुळे येथील परप्रांतीय व राज्यातील इतर भागासह बाहेरगावांतून आलेल्या मजुरांच्या हाताला काम नाही. काम नाही तर दाम मिळत नसल्याने त्यांचा व कुटुंबीयांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी, मजुरांसह त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार सुरू झाली होती.
त्यामुळे तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी शहरातील दानशूर व्यक्ती, गणेश मंडळे, सार्वजनिक मंडळे, सेवाभावी संस्थांना मजुरांना गहू, डाळ, तांदूळ, तेल, मीठ, पीठ, चटणी तसेच जेवणाची पाकिटे आदी जीवनावश्यक वस्तू देण्याबाबत आवाहन केले होते. त्याप्रमाणे येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, लिबर्टी ग्रुप व ओमसाई ग्रुप, कडेपूर येथील निकेतन कांबळे, तालुक्यातील कडेगाव येथील पटेल कुटुंबीय आदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले सण, उत्सव, वाढदिवस, मंडळांचे विविध उपक्रम रद्द करून मजुरांसाठी गहू, डाळ, तांदूळ, तेल, मीठ, पीठ, चटणी, भाजीपाला, किराणा माल तसेच जेवणाची पाकिटे आदी जीवनावश्यक वस्तू तालुका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत.
अशा रीतीने दानशूर व्यक्ती, संस्था व मंडळांकडून प्रशासनाकडे जमा झालेली जीवनावश्यक वस्तूरूपी मदत तालुका प्रशासनातर्फे तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी परप्रांतीयांसह राज्यातील व बाहेरगावातील येथे अडकलेल्या मजुरांसाठी देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे त्यांचा जेवणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे मजुरांसह त्यांच्या कुटुंबीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
उपासमार होणार नाही याची काळजी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय, राज्यासह बाहेरगावांतील असे एकूण 950 मजूर तालुक्यात अडकले आहेत. त्यांची उपासमार होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे यांना आवाहन केले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाकडे रोज विविध जीवनावश्यक वस्तूंची अशी साहित्यरूपी मदत मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. ती संबंधित गरजू मजुरांना वितरित केली जात आहे. तसेच, त्यांना प्रशासनाकडूनही पाच किलो तांदूळ व दहा किलो गहू दिला जात असून, त्यांची उपासमार होणार नाही याची सर्वतोपरी काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.
- डॉ. शैलजा पाटील, तहसीलदार, कडेगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.