सांगली : जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात तीन महिन्यांचा हंगाम पूर्ण केला आहे. मागील आठवड्यापर्यंत 61 लाख टनांहून अधिक गाळप करत 70 लाख क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन घेतले आहे. राजारामबापू कारखाना साखराळे युनिटने गाळपात आणि साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यात मात्र राजारामबापू सर्वोदय आणि दालमिया कारखान्याने 12.24 टक्के उतारा मिळवत आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यात यंदा साखर कारखाने थोड्या उशिराने सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या पंधरवड्यात तर दिवाळीनंतर दुसऱ्या पंधरवड्यात काही कारखान्यांनी हंगामास प्रारंभ केला. सध्या तीन महिन्यांचा हंगाम पूर्ण झाला आहे. यंदा ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आणखी अडीच महिने तरी हंगाम सुरू राहील असे चित्र आहे. त्यामुळे यंदा सर्वाधिक गाळप आणि साखर उत्पादनाचा उच्चांक गाठला जाईल अशी परिस्थिती आहे.
जिल्ह्यात सध्या 15 साखर कारखाने सुरू आहेत. माणगंगा, महांकाली आणि केन ऍग्रो हे कारखाने बंद आहेत. परंतु यंदा तासगाव, यशवंत आणि जत हे तीन कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कारखान्यांचे गाळप कमी असले तरी बंद पडलेले कारखाने सुरू झाल्याचे समाधान आहे. मागील आठवड्यापर्यंत 15 साखर कारखान्यांनी 61 लाख टनांहून अधिक गाळप करत 70 लाख क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगामाच्या शेवटी अधिकाधिक गाळपासाठी चुरस निर्माण होईल अशी परिस्थिती आहे.
गाळप आढावा (17 फेब्रुवारीअखेर)
साखर कारखाना | गाळप (लाख टन) | साखर (क्विंटल) | उतारा |
दत्त इंडिया | 6.65 | 7.76 | 11.65 |
राजारामबापू साखराळे | 6.80 | 8.08 | 11.89 |
विश्वासराव नाईक | 4.93 | 5.52 | 11.20 |
हुतात्मा कारखाना | 4.13 | 4.73 | 11.45 |
राजारामबापू- वाटेगाव | 3.98 | 4.83 | 12.13 |
तासगाव | 1.07 | 1.12 | 10.44 |
*राजारामबापू जत | 1.52 | 1.48 | 9.75 |
सोनहिरा | 6.61 | 7.70 | 11.65 |
क्रांती कारखाना | 6.62 | 7.93 | 11.98 |
राजारामबापू सर्वोदय | 3.03 | 3.71 | 12.24 |
मोहनराव शिंदे | 2.57 | 2.92 | 11.35 |
दालमिया | 2.79 | 3.41 | 12.24 |
यशवंत | 1.10 | 1.15 | 10.42 |
उदगिरी शुगर | 4.24 | 4.84 | 11.42 |
सद्गुरू श्री श्री | 5.00 | 5.38 | 10.75 |
एकूण | 61.08 | 70.59 | 11.56 |
उच्चांकी साखर उत्पादन होणार
गतवर्षी दुष्काळ, महापूर व अतिवृष्टीमुळे गाळप कमी आणि साखर उत्पादनही निचांकी झाले. परंतु यंदा ऊस मुबलक असून हंगाम मे महिन्यापर्यंत लांबणीवर जाईल. त्यामुळे एक कोटी क्विंटलहून अधिक साखर उत्पादनाचा उच्चांक नोंदवला जाईल अशी परिस्थिती आहे.
एफआरपीचा मुद्दा दुर्लक्षित
एकरकमी एफआरपीच्या मुद्द्यावरून यंदा हंगामाच्या प्रारंभी आंदोलने झाली. त्यानंतर काही कारखान्यांचे गट कार्यालय पेटवण्याचे प्रकार घडले. परंतु सध्या हंगाम तेजीत सुरू असून, या मुद्द्याकडे संबंधितांचे दुर्लक्षच झाले आहे. तीन कारखाने वगळता इतरांनी तुकड्यांमध्ये एफआरपी देण्यास प्रारंभ केला आहे.
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.