कोरोनाची धास्ती...अनेक कुटुंबे गावाकडे परतली 

corona.jpg
corona.jpg

सांगली-जगभर धुमाकूळ घातलेल्या "कोरोना' चे चार रूग्ण इस्लामपुरात सापडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असताना त्याच कुटुंबातील आणखी पाचजणांना "कोरोना' झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच कुटुंबातील 9 जण "कोरोना' ग्रस्त झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा धोका वाढल्यामुळे शहरी भागात राहणाऱ्या अनेकांनी कुटुंबानी आपल्या गावाकडे धाव घेतली आहे. 


इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना "कोरोना' झाल्याचे दोन दिवसापूर्वी स्पष्ट झाले होते. चौघेजण नुकतेच सौदी अरेबियातील हज यात्रेला जाऊन आले होते. चौघांना मिरजेच्या सिव्हील हॉस्पिटलमधील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. चौघांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक आणि शेजारील लोकांची तातडीने तपासणी करण्यात आली आहे. त्याच कुटुंबातील आणखी पाचजणांच्या स्वॅबचे अहवाल "पॉझिटीव्ह' आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांनी संख्या आता नऊवर पोहोचली आहे.

संबंधित कुटुंब सौदी अरेबियातील हज यात्रेला जाऊन आल्यानंतर त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यात कौटुंबिक कार्यक्रम देखील झाला होता. काही नातेवाईक कोल्हापूर येथून देखील आले होते. त्यामुळे संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. प्रशासन खबरदारी घेत असल्यामुळे काळजी करू नये असे सांगितले जात आहे. 


सांगली जिल्ह्यात दोन दिवसात एकाच कुटुंबातील नऊ जण कोरोना बाधित रूग्ण आढळल्यामुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. सर्व रूग्णांना मिरजेच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना बाधित कुटुंबामध्ये एकुण 37 सदस्य आहेत. या 37 नातेवाईकांची तपासणी करण्यात आली आहे. ते सध्या होम क्वॉरंटाईन आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. 

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन दिवसात नऊवर झाल्याने शहरी आणि ग्रामीण भागात भितीचे वातावरण आहे. तशातच मुंबई आणि पुणे परिसरात नोकरीनिमित्त गेलेले सांगलीकर वास्तव्यास येथे आले आहेत. त्यावरून शेजारील नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई-पुण्याहून आलेले नागरिक बिनधास्तपणे फिरत आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत यंत्रणा सक्षम दिसत नाही. काही नागरिक गुपचूपपणे पोलिस ठाण्यात तक्रार करून माहिती देत आहेत. परंतू पोलिस सध्या बंदोबस्तात गुंतल्यामुळे ते तत्काळ पोहोचू शकत नाहीत. एकंदरीत या सर्व प्रकारानंतर ग्रामीण भागातून पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या अनेक कुटुंबांनी काल आणि आज सर्व बिस्तारा गुंडाळून गाव गाठले आहे. शहरात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे पोटापाण्याचे काय करायचे? असा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. गावाकडे गेले तर सुरक्षित राहू असा विचार करून तात्पुरत्या स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. संचारबंदी उठल्यानंतरच पुन्हा शहरात यायचे असा असे त्यांनी ठरवले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com