
सोलापूर : विद्यापीठाने परीक्षा सप्टेंबरमध्ये उरकण्याचे नियोजन केल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न करता प्राध्यापक आता अभ्यासक्रम उरकण्याची घाई करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर्षी महाविद्यालये उशिराने सुरू झाली असून आणखी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहितीदेखील झालेली नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आता 108 महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी महाविद्यालये 15 जूनपर्यंत सुरू होतात परंतु, यंदा 20 जूननंतर महाविद्यालये सुरू झाली. त्यातच प्रथम वर्षाचे प्रवेश 16 ऑगस्टपर्यंत सुरू होते तर काही महाविद्यालयांचे आणखी प्रवेश सुरूच आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार एका सत्रात किमान 90 दिवसांचे टिचिंग होणे बंधनकारक आहे. मात्र, प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे 30 दिवसही तास झाले नसतानाही विद्यापीठाकडून आता परीक्षा उरकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
युवा महोत्सव, विधानसभा निवडणूक आणि विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाकडून कारण सांगण्यात येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचारच केला नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आता प्राचार्य संघटना विरोध करण्याच्या तयारी असतानाही दुसरीकडे मात्र, विद्यार्थी संघटना गप्पच असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला - 30 दिवसांत सत्र परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची प्राध्यापकांमध्ये शर्यत, सुटीचे दिवस सोडून अध्यापनासाठी प्राध्यापकांना मिळणार 18 दिवसांचा कालावधी, यूजीसीचे नियम डावलून विद्यापीठाने केले परीक्षेचे वेळापत्रक निश्चित, परीक्षा उरकण्याच्या विद्यापीठाच्या हट्टामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला, विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये परीक्षा उरकण्याचा हट्ट सोडण्याची प्राचार्यांची मागणी
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही सत्राच्या परीक्षेपूर्वी 90 दिवसांचे तास व्हायला हवेत. यंदा उशिराने महाविद्यालये सुरू झाली असून, 16 ऑगस्टपर्यंत प्रवेश सुरू होते. सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याला आमचा विरोध असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. - डॉ. आबासाहेब देशमुख, अध्यक्ष, प्राचार्य संघटना, सोलापूर
बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमध्ये विद्यापीठ अन् महाविद्यालयीन परीक्षेच्या वेळापत्रकाचा निर्णय होतो. मात्र, अशी बैठक झाली नसतानाही विद्यापीठाने परीक्षा आयोजनाचा निर्णय घेतला. त्याचा निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेषत: भविष्यावर होऊ शकतो. याबाबत लवकरच प्राचार्यांची बैठक होईल. - डॉ. विजयकुमार उबाळे, प्राचार्य, दयानंद महाविद्यालय, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.