
सांगली : 'हे बघा, पुढं-मागं कधी बरंवाईट झालं तर मला पुरायचं नाही, मला जाळायचं'... गेली दहा वर्षे ती आपल्या नवऱ्याला बजावत होती. नवरा तीचं सांगणं गंमतीने घेत होता. ती तसं का म्हणत असेल, याचा फार विचार त्यांनी केला नाही. कारण, बायकोचं बरं-वाईट व्हावं, असं का वाटावं? शिवाय, ही अजब मागणी असल्याने त्याबाबत काय करायचं, याचा विचार त्यांनी केला नव्हता. सोमवारी मात्र ती वाईट वेळ आली. बायकोनं शेवटचा श्वास घेतला. जातानाही ती तीच इच्छा बोलून गेली, 'मला अग्नी द्या.'
मिरज तालुक्यातील एरंडोली येथील काशीबाई सावंता माळी (वय 71) याचं सोमवारी निधन झालं. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि विठ्ठल कृष्णाजी पाटील ज्युनिअर कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे माजी चेअरमन सावंता माळी यांच्या त्या पत्नी. गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या रत्नागिरी येथे मुलगा बबन याच्याकडे होत्या. सोमवारी तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आज रक्षाविसर्जन झाले.
सावंता माळी लिंगायत समाजाचे. निधनानंतर दफन करण्याची प्रथा. एरंडोली येथे स्मशानभूमी आणि दफनभूमी एकत्रच आहेत. सोमवारी काशीबाई यांनी शेवटचा श्वास घेतला, त्याच दिवशी त्या पुन्हा एकदा मुलाकडे बोलून गेल्या, 'मला अग्नी द्या.' त्याबाबत मुलाने वडिलांशी चर्चा केली. त्यावेळी सावंता माळी यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. ती गेली दहा वर्षे हेच सांगत होती. ती तसं का म्हणायची, हे विचारायचं राहूनच गेलं. पण, तिची ती इच्छा पूर्ण केली पाहिजे, या भावनेतून त्यांनी समाजातील जाणकारांशी चर्चा करून अग्निसंस्काराचा निर्णय घेतला. समाजाने त्यांच्या या निर्णयाचा सन्मान केला. 'ती तसं का म्हणायची?' या प्रश्नाचं उत्तरही स्मशानातील त्या आगीत जळून गेलं.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.