इंटरनेट पोचले पण मतदान केंद्रेच नाहीत ; मतदानासाठी करावी लागते पायपीट

internet service working but election center not available in belgaum
internet service working but election center not available in belgaum
Updated on

बेळगाव : ग्रामीण भागात इतर सुविधा देण्याबरोबरच इंटरनेट सेवा पोचविण्यात आली आहे. मात्र खानापूर तालुक्‍यातील ८० हून अधिक छोटी गावे, गवळीवाडे येथे मतदान केंद्रे नाहीत. त्यामुळे तेथील जनतेला दुसऱ्या गावात असलेल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

अनेक गावांतील जनेतला मतदानासाठी जाताना त्रास सहन करावा लागत असून अनेकजण मतदानाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मतदानाचा हक्‍क बजाविण्याचे आवाहन करणाऱ्या निवडणूक आयोगाने ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणींकडे लक्ष देणे आवश्‍यक बनले आहे.

खानापूर तालुक्‍याचा विस्तार मोठ्या प्रमाणात असून तालुक्‍यात २१० महसुली गावे आहेत. तर ६३ मजरे (छोटी गावे) आहेत. मात्र यापैकी अनेक गावे दुर्गम भागात असून यापैकी अनेक गावांना अद्यापही मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात येथील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तालुक्‍यातील अनेक गावात मतदान केंद्रे नसल्याने मतदान करण्यासाठी अनेकांना पायपीट किंवा वाहनाने जावे लागते. याची दखल घेत तालुक्‍यात मतदान केंद्राची संख्या वाढविणे आवश्‍यक आहे.

आपल्या गावात मतदान केंद्र नसल्याने नागरिकांना हलगा, चिगुळे, चोर्ला, कणकुंबी, पारवाड, तलावडे, तोराळी, चापोली, कालमनी, बेटगेरी, हब्बनहट्टी, हेम्माडगा, आमटे, मोरब, ओलमनी, डोंगरगाव, तिर्थकुंडये, गुंजी, कामतगे, गणेबैले, माचीगड, हलशी, हलशीवाडी, कोडगई, लोंढा, कारलगा, दोड्डहोसूर, कुप्पटगिरी, नंदगड, शिवठाण, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, घोटगाळी आदी ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्‍क बजावावा लागतो.

नरसेवाडी, करजगी, बस्तवाड, करंजाळ, पडलवाडी, सडा, अनगडी, कृष्णापूर, भांबार्डा, दारोळी यासह ८० हून अधिक गावात मतदान केंद्रांची सुविधा नाही. यामध्ये अनेक मजरे, कमी लोकसंख्या असलेली गावे व गवळीवाड्यांचा समावेश आहे. काही गावातील लोकांना २ ते ६ किमी अंतरावरील गावात जाऊन मतदान करावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी जाताना कष्ट घ्यावे लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर तालुक्‍यातील मतदान केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मात्र तालुक्‍यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन निवडणूक विभागाने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

"तालुक्‍यातील अनेक गावे अतिशय दुर्गम भागात आहेत. तेथील जनेतला मतदान करणे सोपे व्हावे यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविणे आवश्‍यक आहे. आजही अनेकांना चालत मतदानासाठी जावे लागते. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी मतदान केंद्रे वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे."

- पुंडलिक कारलगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य 
 

"अनेक गावांमध्ये सरकारी इमारती, शाळांसह अन्य मुलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे अशा गावांमध्ये मतदान केंद्रे निर्माण करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही अनेक गावांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली आहे."

- रेश्‍मा तालिकोटी, तहसीलदार, खानापूर

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com