नगर ः ""आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व देऊन के. एस. आयटी कंपनीचे देशातील पहिले युनिट आज नगरच्या आयटी पार्कमध्ये सुरू केले. यात 50 आयटी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.
या कंपनीत आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडीफिकेशन डेव्हलपमेंट) चीप तयार केली जाणार आहे. या चीपद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांवर घरबसल्या वॉच ठेवता येणार आहे.'' अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
एमआयडीसीतील आयटी पार्कमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी के. एस. कंपनीचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी राजेश आठरे, गौरव नय्यर, शशी घिगे, साहील सचदेव, शुभम गांधी, नरेंद्र बंडारू आदी या वेळी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ""स्थानिकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी. त्यांचे हे कौशल्य स्थानिक ठिकाणी उपयोगात यावे, या उद्देशाने आयटी पार्क सुरू केले. भविष्यात अजूनही कंपन्यांचा येथे समावेश होणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण यात पुढाकार घेतला आहे.''
2020 पर्यंत एक हजार जणांना रोजगार
जगताप म्हणाले, ""सध्या सुरू असलेल्या आयटी पार्कमध्ये हेल्थ, जनरल लाइफ इन्शुरन्स, ई-बुक आदी कंपन्या काम करतात. सध्या या कंपनीत 260 जणांना रोजगार मिळाला आहे. 2020 पर्यंत एक हजार जणांना रोजगार मिळणार आहे.''
|