कोल्हापूरकरांचे डोळे राधानगरी तलावाकडे

कोल्हापूरकरांचे डोळे राधानगरी तलावाकडे
Updated on

राशिवडे बुद्रुक - गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात राधानगरी आणि काळम्मावाडी धरणातील पाणी संपले आणि सबंध जिल्ह्याला पाण्यासाठी वणवण करावी लागली. एका राधानगरीचा पाण्याचा डेरा रिकामा झाला की सारे कोल्हापूर तहानेने व्याकूळ होते, याचा अनुभव घेतला. यंदाही तशी वेळ येऊ नये म्हणून सगळ्यांचेच लक्ष राधानगरी तलावाकडे लागले आहे. गेल्या वर्षीहून अधिक पाणी आजमितीस कमी झाले आहे. यामुळे जनमानसात भीती निर्माण झाली आहे. गैबी बोगद्याच्या ओढ्यावरील पूल बांधकामामुळे राधानगरीवर ताण पडला असला तरी कोल्हापूरच्या वाट्याचे पाणी काळम्मावाडी धरणात शिल्लक असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.

राजर्षी शाहूंची कृपादृष्टी आणि राधानगरीचा ‘लक्ष्मी’ तलाव समर्थ आहे तोपर्यंत पाण्याची भीतीच नसते. मात्र, गेल्या वर्षीचा उन्हाळा याला अपवाद ठरला. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण झाली. अखेरचा महिना तर पाण्यासाठी जागृती करण्याची वेळ आली होती. भोगावती नदीवरून उपसाच बंद केल्याने शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन निम्याने घटले. 

यामुळे आतापासूनच सगळ्यांचे डोळे राधानगरीच्या डेऱ्यावर लागले आहे. आताच निम्मे पाणी संपल्याने लोकांतून चिंतेचा सूर उमटू लागला आहे. जर शेतीला व पिण्याला पाणी कमी पडले, तर गंभीर परिणाम होतील, असा दमही राजकीय नेते देऊ लागले आहेत, तर यंदा राधानगरी तालुक्‍यातील सर्व धरणे चांगला पाऊस झाल्याने भरली असून, पुरेसा पाणी साठा असल्याचा पाटबंधारे विभागाचा दावा आहे.

राधानगरी धरणामध्ये गेल्या वर्षी आजपर्यंत (ता. १०) ३.३८ टीएमसी साठा होता. यंदा ३.३६ टीएमसी शिल्लक आहे. आज आठशे क्‍युसेक विसर्ग सुरू आहे, तर काळम्मावाडीत गेल्या वर्षी ६.२६ टीएमसी साठा होता. यंदा १३.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

काळम्मावाडी धरणाचे पाणी गैबी बोगद्याद्वारे ज्या ओढ्यातून भोगावती नदीत आणले जाते, त्यात सोन्याची शिरोली ते कुडुत्री दरम्यान असलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे. यामुळे पंचगंगेत पाणी सोडण्यासाठी राधानगरी धरणावर अतिरिक्त ताण पडत आहे. हा तांत्रिक मुद्दा राधानगरीतील पाणीसाठा कमी होण्यास कारण असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. 

प्रत्येक वर्षी आम्ही नियमाने पाणी सोडतो, असा दावा अधिकारी करतात. भोगावतीचे काठ बुडेपर्यंत पाणी सोडतात आणि ऐनवेळी पाणी संपले, की हात झटकतात. गेल्या वर्षी अखेरच्या दीड महिन्यात शेतीला पाणी मिळाले नाही याचा फटका शेतकऱ्याला बसला. यंदा असे घडल्यास अधिकारी आणि नेत्यांनाही आम्ही सैल सोडणार नाही. 
- प्रा. डॉ. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com