‘वाहतुकीचे नियम पाळा’ हा संदेश देत कोल्हापूरच्या युवकाची १२ हजार किमी भ्रमंती

‘वाहतुकीचे नियम पाळा’ हा संदेश देत कोल्हापूरच्या युवकाची १२ हजार किमी भ्रमंती

कोल्हापूर - ‘वाहतुकीचे नियम पाळा’ हा संदेश देण्यासाठी कोल्हापूरच्या युवकाने दोन देशांची एकट्याने भ्रमंती केली. २७ दिवस, १२ हजार १५४ किलोमीटरचा प्रवास, तीन देश असा हा रोमहर्षक प्रवास त्याने पूर्ण केला. ओमकार विजय बुधले (वय ३०, रा. आर. के. नगर) असे या तरुणाचे नाव असून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्वांना प्रेरित करावे, या एका भावनेने त्याने हे कृत्य केले. प्रवासामध्ये ओमकारने या तीनही देशांतील प्रसिद्ध स्थळांना भेट दिली. 

१२ सप्टेंबरच्या रात्री सुरू झालेला हा प्रवास ८ ऑक्‍टोबरला रात्री संपला. जिद्द आणि काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीला सामाजिक भानाची आणि जबाबदारीची जोड मिळाल्यास आजचा युवक इतिहास घडवू देखील शकतो आणि इतिहास बदलूही शकतो हे ओमकार बुधले याने सिद्ध केले आहे. 

दुचाकी चालवण्याची आवड असणाऱ्या ओमकारने भारत, भूतान आणि नेपाळ हे तीन देश पालते घालत तेथील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. त्याचा हा प्रवास सहज नव्हता. पाऊस, ऊन आणि प्रचंड थंडी अशा ऋतुमानाचा सामना या प्रवासादरम्यान त्याला करावा लागला. प्रवासाची सुरवातच भर पावसात झाली. कोल्हापूर येथून निघताना प्रचंड पाऊस होता. पावसानेही १५०० किलोमीटरपर्यंत पाठ सोडली नाही.

या प्रवासादरम्यान वडोदरा येथील स्टॅचू ऑफ युनिटी या जगातील सर्वांत उंच असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला भेट दिली. या ठिकाणी आलेला पर्यटकांशी आणि नागरिकांशी संवाद साधत रस्ते, हेल्मेट वापर आणि वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती दिली. येथून पुढे हा प्रवास जयपूर, चंदीगड असा होत मनाली, लेह, खारडुंगलापर्यंत पोचला. वडोदरानंतर प्रचंड उष्म्याला सुरवात झाली होती. यावेळी इतका उष्मांक होता की दुचाकी चालवताना उष्णतेने शरीराला चटके बसत होते. यामुळे शरीराला जखम देखील झाली. त्याउलट मनाली आणि लेह येथे थंडी होती.

खारडुंगा येथील तापमान हे उणे दोन डिग्री सेल्सियस होते. अशा परिस्थितीत गाडीवरील नियंत्रण राखणे आव्हानात्मक असते. मात्र, हे आव्हानही पूर्ण करत येथून परतीचा प्रवास केला. येथून आग्रा, लखनऊ, सुनोली बॉर्डर, पोखरा, काठमांडू, इठोरी, गंगटोक ते भूतान असा प्रवास झाला. या प्रत्येक ठिकाणी देखील तेथील महत्त्वाच्या आणि पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी भेट देऊन वाहतूक नियमांच्या पालनासंदर्भात जागृती केली. शेलेला पास येथून सिलीगुडीमार्गे कोलकाता हा प्रवास पुन्हा सुरू झाला. 

दरम्यान, बिहारमध्ये आलेल्या महापुराचा सामना देखील यावेळी करावा लागला. यामधून बाहेर पडत विशाखापट्टणम, चेन्नई ते दक्षिणचे शेवटचे टोक असणाऱ्या कन्याकुमारीपर्यंतचा पल्ला गाठला. बंगळूर, हैद्राबाद, हुबळी ते पुन्हा कोल्हापूर हा प्रवासाचा अंतिम टप्पा पूर्ण केला. या प्रवासाने खूप काही शिकवले असल्याची भावना ओमकार व्यक्त करतो. तसेच प्रवासाची प्रेरणा ही खऱ्या अर्थाने पत्नी आणि मुलांमुळे मिळाल्याचे सांगितले. ओमकारने केलेला हा प्रवास सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेमधलाच होता. सूर्यास्त झाल्यानंतर प्रवास केला नसल्यामुळे आणखीन काही दिवस प्रवास सुरू ठेवावा लागला. 

जाईल तेथे चांगला अनुभव आला. एक वर्षाहून अधिक काळ या प्रवासाच्या तयारीसाठी द्यावा लागला होता. त्याचे सार्थक झाले. सर्वांत कमी वेळेत आणि सर्वाधिक लांब पल्ल्याचा हा प्रवास असून, याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि लिम्का बुल ऑफ रेकॉर्डससाठी होण्याची शक्‍यता आहे. यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
- ओमकार बुधले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com