डॉ. एन डी पाटील; ‘रयत’चा आधारस्तंभ

‘‘रयत माझा श्वास आहे’’, असा हा रयतचा महामेरू आज आपल्यातून गेला आहे. रयतचे ते खरे भीष्माचार्य होते.
डॉ. एन डी पाटील
डॉ. एन डी पाटीलsakal

रयत शिक्षण संस्था आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील या एकाच नाण्याच्या दोन बाजू. कर्मवीर भाऊराव पाटील आणि ‘रयत’वर त्यांचे नितांत प्रेम होते. अत्यंत निष्ठा होती. ते नेहमी म्हणत, ‘‘रयत माझा श्वास आहे’’, असा हा रयतचा महामेरू आज आपल्यातून गेला आहे. रयतचे ते खरे भीष्माचार्य होते.

- डॉ. अनिल पाटील,

कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा

रयत शिक्षण संस्थेशी डॉ. एन. डी. पाटील यांचा १९४४ पासून संबंध आहे. संस्थेच्या आष्टा येथील शाळेत ते प्रथम दाखल झाले. संस्थेत शिक्षण घेऊन त्यांनी शाळा-महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून सेवा केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ते अतिशय लाडके होते. इतके की त्यांच्या जीवनाचा कोपरा अन्‌ कोपरा संस्था आणि कर्मवीर अण्णांवरील प्रेमाने भरून गेला होता. कर्मवीरांची सेवा करण्यात त्यांनी स्वतःला धन्य समजले होते. कर्मवीरांनी उभारलेली ही संस्था शिक्षणाची अखंड वाहणारी गंगोत्री झाली पाहिजे. ग्रामीण मुले शिकली पाहिजेत. हा ध्यास त्यांनी सतत घेतला होता. संस्थेसाठी त्यांनी काय नाही केले? संस्थेच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. ग्रामीण भागात शाळांसाठी जमिनी आणि देणग्यांसाठी ते वणवण हिंडले आहेत.

एन. डीं.नी सामाजिक, राजकीय क्षेत्रातही मोठे योगदान दिले. मात्र, जाईल त्या क्षेत्रात संस्थेचे आणि शिक्षणाचे हित पाहिले. संस्थेत त्यांनी आजिव सेवक ते कार्याध्यक्ष पदापर्यंत काम केले. १९८९ ते २००८ असे १८ वर्षे त्यांनी काम केले. शासनाने विनाअनुदानित शाळा सुरू करण्यास परवानगी देताच ग्रामीण भागात शाळा नसतील तेथे त्यांनी एकाचवेळी ८६ शाळा सुरू केल्या. शासनाने आश्रमशाळांची योजना सुरू केली. आदिवासी, दुर्गम भागात या शाळा सुरू करण्यास कोणी धजावत नव्हते. मात्र, एनडींनी ते आव्हान स्वीकारले आणि मोखाड, खरोशी अशा अतिदुर्गम ठिकाणी आठ आश्रमशाळा सुरू केल्या. सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केल्या. ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास त्यांनी कायम जपला.

म्हणूनच शासन संस्थेला वैद्यकीय महाविद्यालय देत असूनही त्यांनी ते घेतले नाही. ते म्हणत, ‘वैद्यकीय महाविद्यालयांसाठी इमारती, हॉस्पिटल बांधण्याच्या खर्चात मी ग्रामीण भागात पाच-पन्नास शाळा काढीन.’ एन. डी. हे दूरदृष्टीचे होते. शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत, ही दृष्टी त्यांनी ठेवली आणि त्याप्रमाणे त्यांनी महाविद्यालयांनाही प्राधान्य दिले.शिक्षणमंत्र्यांनी एकदा शाळांना लोअर गणित आणि लोअर इंग्रजी शिकविण्यास सुरू करण्याचे विधानसभेत विधेयक आणले होते. हे विधेयक पास झाले, तर ग्रामीण भागातील मुले इंग्रजी व गणितात कच्ची राहतील, इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षण घेऊ शकणार नाहीत, हे एनडींनी जाणले आणि या विधेयकाला कडाडून विरोध केला. त्यासाठी सर्व आमदारांची एकजूट करून तत्कालिन शासनाला त्यांनी विधेयक मागे घेण्यास भाग पाडले होते. प्राथमिक शिक्षण सर्व मुलांना मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षण हक्कासाठी राज्यभर रान उठविले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com