Ichalkaranji News : इचलकरंजीत क्रांतीदिनी पाण्यासाठी एल्गार; मानवी साखळीतून शासनाचे वेधणार लक्ष

इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड उद्भव असलेल्या दुधगंगा योजनेसाठी उद्या (बुधवार) इचलकरंजीकर मानवी साखळीच्या माध्यमातून क्रांती दिनी एकजुटीचा एल्गार करणार आहेत.
Dudhganga Scheme
Dudhganga SchemeSakal

इचलकरंजी - इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड उद्भव असलेल्या दुधगंगा योजनेसाठी उद्या (बुधवार) इचलकरंजीकर मानवी साखळीच्या माध्यमातून क्रांती दिनी एकजुटीचा एल्गार करणार आहेत. सांगली रोडवरील पाटील मळा ते सांगली नाका या मार्गावर सकाळी १० ते ११ वाजता ही मानवी साखळी करण्यात येणार आहे. या माध्यमातून इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.

राजकीय पक्ष विरहीत सुरु करण्यात येत असलेल्या या लोकलढ्यातील हे पहिले पाऊल असणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांत जनजागृती करण्यात आली आहे. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या उपक्रमांतून पाणी प्रश्नावरील लोकलढ्याचे बिगूल वाजणार आहे.

इचलकरंजी शहरासाठी पाणी देण्यास ग्रामीण भागातून विरोध होत आहे. सुरुवातील वारणा काठावरील नागरिकांनी विरोध केला. आता दुधगंगा काठावरील गावांतून विरोध होत आहे. त्यामुळे पाण्यासारख्या पवित्र प्रश्नावर शहर आणि ग्रामीण असा नाहक वाद निर्माण होत चालला आहे.

येणा-या प्रत्येकाला रोजगार देणा-या वस्त्रनगरीला सातत्यांने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शहराच्या भविष्याच्यादृष्टीने दुधगंगा योजने मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र याबाबत शासन स्तरावर फारशी ठोस भूमिका घेतला जात नसल्यामुळे या प्रश्नाचा गुंता वाढत आहे.

त्यामुळे इचलकरंजीसाठी मंजूर झालेली दुधगंगा (सुळकूड) योजना झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी आता प्रत्येक इचलकरंजीकर करीत आहे. यातूनच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लोकचळवळ सुरु होत आहे. यासाठी सर्वपक्षीय सुळकूड पाणी योजना कृती समितीची स्थापना झाली आहे.

या समितीच्या माध्यमातून याप्रश्नी पाठपुरावा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रांत कार्यालयावर २१ ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने सांगली रोडवर मानवी साखळीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (बुधवार) सकाळी १० ते ११ वाजता ही मानवी साखळी होणार आहे.

त्यासाठी समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली आहे. तर विविध भागात बैठका घेण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या मानवी साखळीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावरील लढ्यातील हा सर्वात महत्वाचा ठप्पा ठरण्याची शक्यता आहे.

कृती समितीचा कार्यक्रम असा

* मानवी साखळी - ९ ऑगस्ट - सकाळी १० ते ११ वाजता, सागंली रोड

* प्रशिक्षण शिबीर - १० ऑगस्ट - सायंकाळी ५ ते ७ वाजता, समाजवादी प्रबोधिनी

* जनजागरण मोहिम - ९ ते १८ ऑगस्ट - विभागीय बैठका घेवून लढ्याबाबत जागृती

* विराट मोर्चा - २१ ऑगस्ट - सकाळी १०.३० वाजता - गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय

या भागातील नागरिक होणार सहभागी

मानवी साखळीत शहरातील विविध भागातील नागरिक सहभागी होणार आहेत. तथापि, प्राधान्यांने सांगली रोड परिसरातील नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग असणार आहे. यामध्ये आसरानगर, सिध्दी विनायक कॉलनी, निशीगंध सोसायटी, मधुबन सोसायटी, सोलगे मळा, साईट नं.१०२, सहकारनगर, येलाज मळा, गुलमोहर कॉलनी, वृंदावन कॉलनी, मथुरानगर, पाटील मळा आदी परिसरात बैठका झाल्या आहेत. या परिसरात कार्यकर्त्यांनी घरोघरी पत्रके वाटण्यात आली आहेत.

शिस्तबध्दतेला प्राधान्य

मानवी साखळी करतांना शिस्तबध्दता राखली जाणार आहे. वाहतूकीला फारसा अडथळा न करता हा उपक्रम करण्यावर भर दिला जात आहे. आक्रमक घोषणा न देता हातात विविध घोषवाक्याचे फलक घेतले जाणार आहेत. यातून दुधगंगा योजनेतून शहराला पाणी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाणार आहे. हा लढा कोणा विरोधात नसून हक्काच्या पाण्यासाठी असणार आहे, असा संदेश देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com