
कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी गटाला धक्का देत महापौरपदाची निवडणूक जिंकणारे माजी महापौर महंमद गौस ऊर्फ बाबू हारून फरास (वय ७०) यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सत्ताधारी गटाला गाफील ठेवत महापौरपदी विराजमान झालेल्या बाबू फरास यांची त्यानंतर ‘बिन आवाजाचा बॉम्ब फोडणारा महापौर’ अशी ओळख बनली. या महापौरपदाच्या कालावधीत त्यांनी शिंगणापूर थेट पाईपलाईन योजना मंजूर करण्याबरोबरच ६१२ हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी माजी महापौर हसीना फरास, दोन मुलगे माजी नगरसेवक आदिल व वासीम फरास, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या (ता. १९) सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते मुस्लिम बोर्डिंगचे माजी संचालक तसेच नेहरू हायस्कूलचे चेअरमनही होते.
वडील हारून फरास शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे बाबू फरास यांची सार्वजनिक जीवनातील वाटचाल शेकाप तसेच डाव्या चळवळीतून झाली. कमी शिक्षण असतानाही वयाच्या २६ व्या वर्षी ते १९७८ ते १९८४ दरम्यान पहिल्यांदा, तर त्यानंतर १९८५ ते १९९० तसेच १९९५ ते २००० या कालावधीत नगरसेवक झाले. या कालावधीत त्यांनी पक्ष प्रतोद, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, शिक्षण समिती सदस्यपदही भूषविले. शिक्षण मंडळात दोन दशकांहून अधिक काळ काम केले. ते विरोधी गटात असताना १९९९ मध्ये झालेली महापौरपदाची निवडणूक गाजली. त्यांच्या आघाडीकडे १८ नगरसेवक असताना निवडणूक जिंकली. त्या वेळी शिवसेनेच्या ११ सदस्यांनी तसेच भाजपच्या दोन सदस्यांनीही त्यांच्या बाजूने मतदान केले. यामुळे फरास यांना ३८, तर सत्ताधारी ताराराणी आघाडीचे उमेदवार नंदकुमार वळंजू यांना ३३ मते मिळाली. ते १७ नोव्हेंबर १९९९ ते १७ नोव्हेंबर २००० पर्यंत महापौर होते.
मी अजून जिवंत
गेल्या काही वर्षांत त्यांची प्रकृती ठीक नव्हती. २०१४ मध्ये महापालिकेची सभा सुरू असताना त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच रिवाजाप्रमाणे सभा तहकूब करण्यात आली; पण त्यावेळी प्रकृतीत सुधारणा झाली. या प्रकाराची चर्चा शहरात झाली. त्यानंतर दोन दिवसांनंतर ते थेट महापालिकेच्या चौकातच आले. तेथे येऊन मी अजून जिवंत आहे, असे पत्रकार कक्षाकडे पाहत त्यांनी सांगितले.
मुस्लिम समाजातील पहिले महापौर
फरास यांना महापौर करण्यात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरली. फरास यांनी तत्कालीन आमदार सुरेश साळोखे यांच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. मदत करण्याची विनंती केल्यावर ठाकरे यांनी ‘महापौर करतो, शिवसेनेने महापौर केले असे जाहीरपणे सांगणार का?’ असे विचारल्यावर फरास यांनी तत्काळ मी जाहीर सांगतो, असे म्हटले. शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेमुळे फरास महापौर झाले. त्यानंतर त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. त्या वेळी शिवसेनेत प्रवेश कर, पुढे मंत्री करतो, असा शब्दही दिला होता. मुस्लिम समाजाचा पहिला महापौर करण्यात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.