
बेळगाव : बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एल ॲन्ड टी कंपनीकडे हस्तांतरित होण्यापूर्वी पाणीपट्टीत वाढ होण्याचे संकेत आहेत. पाणीपुरवठा मंडळाने याबाबतचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे. याबाबत महापालिका प्रशासक व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ निर्णय घेणार आहेत.
प्रशासकांनी प्रस्तावाला मंजुरी दिली तर अंतिम मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे, घरपट्टीनंतर बेळगावकरांना पाणीपट्टीवाढीचा शॉक बसणार आहे.
पाणीपुरवठा मंडळाच्या मते २०११ पासून पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. शासनाच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी पाणीपट्टी वाढ व्हायला हवी. पण, लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात असताना पाणीपट्टीत वाढ झाली नाही. त्यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीनवेळा हा विषय चर्चेला घेण्यात आला.
पण, प्रत्येकवेळी पाणीपट्टी वाढविण्यास विरोध करण्यात आला. आता पाणीपुरवठ्याचा वाढलेला खर्च, वाढलेले वीज बिल लक्षात घेऊन मंडळाने पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत शुक्रवारी (ता. १३) झालेल्या प्रशासकीय बैठकीत प्रशासक हिरेमठ यांनी एल ॲन्ड टी कंपनीचे प्रतिनिधी, पाणीपुरवठा मंडळ व पायाभूत सुविधा मंडळाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात अनौपचारीक चर्चा केली. एल ॲन्ड टी कंपनीकडे पाणीपुरवठा हस्तांतरीत झाल्यानंतर पाणीपट्टी वाढविली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे, असा कोणता निर्णय झाला आहे का, अशी विचारणा प्रशासकांनी केली.
त्यावेळी चोवीस तास पाणीपुरवठा सुरु असलेल्या दहा प्रभागांतील वाढीव बिलांचा विषय सध्या चर्चेत असल्याचे सांगण्यात आले. पण, यावेळी पाणीपुरवठा मंडळाने शहरात सरसकट पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रस्तावाची माहिती दिली नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने त्यासंदर्भात मंडळाचे बेळगावातील कार्यकारी अभियंते चंद्राप्पा यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असताना त्यांनी पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिल्याचे सांगितले.
चोवीस तास पाणी योजनेचा ठेका एल ॲन्ड टी कंपनीकडे देण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यात शहर पाणीपुरवठ्याचे हस्तांतरण या कंपनीकडे केले जाणार आहे. त्यानंतर पुढील बारा वर्षे पाणीपुरवठ्याची जबाबदारी कंपनीकडे राहणार आहे. कंपनीकडून पाणीपट्टी वाढ झाली तर विरोध होऊ शकतो. हे गृहीत धरुनच मंडळाने पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पण, किती टक्के पाणीपट्टी वाढणार हे मंडळाने गुलदस्त्यात ठेवले आहे. २०११ मध्येही प्रशासकांकडूनच पाणीपट्टी वाढ करून घेण्यात आली होती. आता पुन्हा प्रशासकीय काळातच हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
"शहरातील पाणीपट्टी २०११ नंतर वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी महापालिकेकडे पाठविण्यात आला आहे."
- चंद्राप्पा, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा मंडळ
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.