कोल्हापूर - जिल्ह्यात वर्षानुवर्षे पुराची परिस्थिती गंभीर होत आहे. बागायती शेतीसह रहिवासी, व्यापारी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. मानवनिर्मित असणाऱ्या पुरामुळे आणि चुकीच्या विकासकामांमुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. १३० गावांना याचा फटका बसतो, त्यामुळे पूरबाधित सर्वच गावांनी विकासकामांमध्ये बदल घडविण्यासाठी किंवा रस्ते, पूल करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती समजावून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी, पूरग्रस्त समितीच्यावतीने पापाची तिकटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवार (ता. २९) सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक बाजीराव खाडे यांनी निवेदनाद्वारे दिली.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील पूरबाधित गावांमधील लोकांच्या अंगावर शहारे येतात. हा महापूर नैसर्गिक नाही, तर मानवनिर्मित आहे. जिल्ह्यात विकासकामांच्या नावावर चुकीची कामे केल्याचा फटका कोल्हापूरवासीयांना बसत आहे. त्यामुळे पूर परिस्थितीचा शास्त्रीय अहवाल व तो तयार करताना पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करावी. पूरग्रस्तांची मते आणि भावना जाणून घेतली पाहिजे. हा अहवाल तत्काळ व गतीने तयार केला पाहिजे. पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा करणाऱ्या रस्त्यावर पूल, मोऱ्या, पाईपची कामे सुरू केली पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी निमंत्रण द्यावे, अशी मागणी खाडे यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.