
वाहतूक नियंत्रण विभागाविरोधात आंदोलन
17303
वाहतूक नियंत्रण विभागाच्या
कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन
चुकीच्या फलकांकडे ‘एआयएसएफ’ने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः महापालिका आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने शिवाजी रोडच्या रस्त्याच्या दुतर्फा चुकीच्या पद्धतीचे आणि वाहतूकदारांची दिशाभूल करणारे फलक लावले आहेत. चुकीच्या फलकामुळे बाहेरगावचे प्रवासी चुकीच्या ठिकाणी वाहने पार्किंग करतात आणि त्यांच्याकडून वाहतूक नियंत्रण विभाग दंड वसूल करतो. या भोंगळ कारभाराविरोधात आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने वाहनांचे ठिय्या आंदोलन केले.
फेडरेशन, महाराष्ट्राचे राज्यसचिव प्रशांत आंबी म्हणाले, ‘‘अठरा एप्रिलला चुकीच्या फलकांना हार घालून उपहासात्मक आंदोलन झाले. दुसऱ्या दिवशीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फलक बदलला. मात्र, त्यातही चुका होत्या आणि दंडाची कारवाई काही थांबत नव्हती. वारंवार सांगूनही वाहतूक पोलिस दखल घेत नव्हते. एकाच कामात तीन तीन वेळा हे अधिकारी चुकत असतील, तर ही खरंच गंभीर गोष्ट आहे. जर अधिकाऱ्यांना आणि फलक लावणाऱ्यांना सम-विषम पार्किंग कळत नसेल तर सामान्य माणसांना कसं कळणार? त्यामुळे हे फलक जोपर्यंत बदलले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.’’ ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष हरिष कांबळे यांनी वाहतूकदारांची अन्यायी लूट थांबली पाहिजे, असे सांगितले. यावेळी आरती रेडेकर, कृष्णा पानसे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..