‘तुळशी’तील पाण्याचे नियोजन करताना कसरत

‘तुळशी’तील पाण्याचे नियोजन करताना कसरत

01566
धामोड (ता. राधानगरी) ः येथील तुळशी धरणात ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. (छायाचित्र : केरबा जाधव)
........
‘तुळशी’तील पाण्याचे नियोजन करताना कसरत

पाणीसाठा ४४ टक्के; तीव्र उन्हामुळे पिण्यासह पिकांना पाणीपुरवठ्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. ११ : दोन तालुक्यांतील २२ गावांना वरदायी ठरलेल्या येथील तुळशी धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा आहे. सध्या येथील धरणात ४३.९३५ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, पाणीपातळी ६०४.७१ मी. आहे, तर गतवर्षी ४१.८४५ द.ल.घ.मी. पाणीसाठा व ६०४.१६ मी. पाणीपातळी होती. सध्या धरणात ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणी आणि वाढत्या उष्णतेमुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने पाटबंधारे विभागाला जूनअखेरपर्यंत पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.
राधानगरी तालुक्यातील प्रमुख तीन धरणांपैकी एक असलेले येथील तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात कमी झालेल्या पावसामुळे गतवर्षी पूर्णक्षमतेने भरले नाही. धरणाशेजारी असलेल्या केळोशी येथील लोंढा नाला धरणातील पाण्याचा विसर्ग उजव्या कालव्यातून केल्याने तुळशी धरण ८८ टक्के भरले. धरणात एप्रिलमध्ये ५६ टक्के पाणीसाठा होता. तीव्र उन्हाच्या झळांमुळे होणारे बाष्पीभवन, कोल्हापूर शहरातून पाण्याची वाढलेली मागणी त्यामुळे २०० क्यूसेकचा विसर्ग तुळशी नदीपात्रात सुरू असल्याने धरणातील पाणीपातळी कमालीची कमी झाली आहे.
सध्या तुळशी धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी वाढल्याने तुळशी नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाला पोषक वातावरण निर्माण होत असले तरी देखीलही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वळवाने हुलकावणी दिली आहे. तीव्र उष्णतेमुळे पिकांना पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर परिणाम जाणवत आहे. कोल्हापूर शहरासाठीही तुलशी धरणातून पाण्याची मागणी वाढत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ३०० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. सकाळपासून धरणातून १५० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे येथील पाटबंधारे प्रशासनाला जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याचे सूक्ष्म नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
..........
प्रतिक्रिया.....
तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षी पावसाची नोंद ३७०० मिलिमीटर झाली होती. केळोशी धरणातून उजव्या कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे धरण ८८ टक्केच भरले. येथील प्रशासनाने पिण्यासाठीचे व शेतीसाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्याने टंचाई गरज निर्माण होणार नाही.
अंजली कारेकर, तुळशी शाखा अभियंता
.......
प्रतिक्रिया...
तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप वळीव पाऊस झालेला नसल्याने पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात सुरू असून, कार्यक्षेत्रातील पाण्याचा वापर लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करावे. नदीपात्रातील विसर्गाचे प्रमाण सद्यःस्थितीत कमी ठेवावे.
दगडू चौगले, शेतकरी, कुरणेवाडी
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com