करवीर तालुक्यात नवीन १७ सजे,आणि ३ मंडळाची निर्मिती

करवीर तालुक्यात नवीन १७ सजे,आणि ३ मंडळाची निर्मिती

Published on

जिल्ह्यात नवीन ३१ तलाठी सज्जे
पुनर्रचना पूर्ण ः करवीर तालुक्यात १७ ठिकाणी सुविधा, शेतकऱ्यांची कामे गावातच होणार

कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ६ ः जिल्ह्यातील गावांचा महसुली कारभार पाहणाऱ्या तलाठ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तलाठी सज्जांची पुनर्रचना पूर्ण झाली असून, जिल्ह्यात नव्याने एकतीस सज्जे होणार आहेत. सर्वाधिक सतरा सज्जे व तीन मंडल कार्यालये करवीर तालुक्यात होणार आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना गावातच जमिनीची कागदपत्रे मिळणार आहेत.
२२ वर्षे सज्जा फोडची मागणी होती. महसूलमंत्री असताना बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत सज्जांचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. १९८३ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी सज्जांची पुनर्रचना केली होती. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनंतर सज्जांची पुनर्रचना झाली. जिल्ह्यात १ हजार २१८ महसुली गावे व ४५४ सज्जे आहेत.
करवीर तालुक्यात १७ नवीन सज्जे तयार झाले आहेत. त्यामध्ये उचगावमधून उचगाव दक्षिण स्वतंत्र झाले. मुडशिंगीमधून मुडशिंगी उत्तर स्वतंत्र, तर कणेरीमधून कणेरीवाडी स्वतंत्र झाले. गोकुळ शिरगावमधून उजळाईवाडी व सरनोबतवाडी स्वतंत्र झाले. नेर्लीमधून तामगाव, पाचगावमधून मोरेवाडी स्वतंत्र झाले. बालिंगेमधून दोनवडे व खुपिरेमधून साबळेवाडी स्वतंत्र होऊन दोनवडे-साबळेवाडीचे एक स्वतंत्र झाले. शिंगणापूरमधून हणमंतवाडी व नागदेववाडी स्वतंत्र झाले. जाधववाडीमधून टेंबलाईवाडी, कसबा बावडामधून कसबा बावडा पूर्व स्वतंत्र झाले. कसबा करवीरमधून पाच स्वतंत्र सज्जे झाले. मात्र, या पाच गावांची नावे एकमत नसल्यामुळे अद्याप निश्चित झाली नाहीत. तसेच शिंगणापूर, गोकुळ शिरगाव, उचगाव अशी तीन मंडल कार्यालये नवीन होतील.

चौकट
रिक्त पदे भरावी लागणार
करवीर तालुक्यात एकूण ११ सर्कल व ६७ तलाठी पदे आहेत. त्यांपैकी सात तलाठी पदे रिक्त होती. आता पुन्हा १७ पदे भरावी लागणार आहेत. सज्जा फोड झाल्यामुळे शेतकऱ्यांची, नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत. सज्जा फोड झालेले गावांचे ऑनलाईन सातबारा स्वतंत्र झाले आहेत; मात्र गावांच्या ठिकाणी तलाठ्यांना चावडी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यासाठी चावडीचे प्रस्ताव यंदा महसुली वर्षात देण्यात येणार आहेत. २०१७ च्या अधिसूचनेनुसार भरतीला राज्य शासनाची मान्यता होती. सध्या तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी कामाला गती दिली आहे.

कोट
सज्जा फोड झाल्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया सुलभ होईल. प्रशासकीय कामकाजामध्ये गती येईल. शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होईल. नागरिकांच्या सोयीसाठी सज्जा फोड करण्यात आली. त्यामुळे कामात सुसूत्रता व गतिमानता येईल.
-विजय जाधव, नायब तहसीलदार, महसूल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.