जिल्ह्यात भाताच्या 60 हजार हेक्टरवर पेरण्या,रोप लागणीला गती

जिल्ह्यात भाताच्या 60 हजार हेक्टरवर पेरण्या,रोप लागणीला गती

Published on

जिल्ह्यात भाताच्या ६० हजार हेक्टरवर पेरण्या

रोप लागणीला गतीः सोयाबीनची पेरणी ३० हजार हेक्टरवर


कुडित्रे, ता. ८ः जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने जोर धरला आहे, यामुळे खोळंबलेल्या खरिपातील भाताच्या रोप लागणीला गती आली आहे. जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे, तर ३० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी खात्याने दिली. दरम्यान, एक महिना खरिपाच्या पेरण्या पुढे गेल्याने भात व सोयाबीन पिकाची काढणी, कापण्या परतीच्या पावसात सापडणार असल्याचे चित्र आहे.

गेली दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे. हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यात काही प्रमाणात पाऊस कमी आहे, तर राधानगरी, आजरा, चंदगड, गगनबावडा, भुदरगड, करवीर तालुक्यात चांगला पाऊस सुरू आहे. यंदा धूळवाफ पेरणीचे प्रमाण कमी राहणार आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे रोप लागणीला वेग आला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास येत्या दोन दिवसांत ९० टक्के पेरणी होईल व जुलैअखेर खरिपाच्या पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, पावसाने जोर धरल्यामुळे ऊस पिकात पाला पाडणे व खत टाकणीला गती आली आहे.
सोयाबीनची पेरणी एक महिना पुढे गेली आहे. ६ जून ते १५ जून पर्यंत सोयाबीनची पेरणी व्हावी लागते, तरच पुढील हंगाम व्यवस्थित निघतो. आता उशिरा पेरणी झाल्यास यामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवेल. तसेच परतीच्या पावसात काढणी येईल, यामुळे पुन्हा नुकसान होईल. यासाठी शेतकऱ्यांनी उडीद, मूगसारखी कमी दिवसात निघणारी पिके घ्यावीत, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
दरम्यान, जून महिन्यात ३९० मिलिमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा फक्त ३० टक्के पाऊस झाला. जुलै महिन्यात ६७५ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत फक्त पंधरा ते वीस टक्के पाऊस झाला आहे. यामुळे खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसणार असून उत्पादन घटेल, असे चित्र आहे.
...

भात रोपांची चणचण

जिल्ह्यात भाताचे ९२ हजार हेक्टर तर सोयाबीनचे ४२ हजार हेक्टर क्षेत्र असते. यंदा चोपण, कुरीने पेरणी साधली नाही, तसेच टाकलेला तरवा उष्मा असल्यामुळे खराब झाला. यामुळे रोपांची चणचण निर्माण झाली आहे. शेतकरी रोपांच्या शोधात दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.