जिल्ह्यासह, पाच तालुक्यांचा कारभार रामभरोसे,   पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

जिल्ह्यासह, पाच तालुक्यांचा कारभार रामभरोसे, पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

जिल्ह्यासह पाच तालुक्यांचा कारभार रामभरोसे
कृषी विभागः पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त
कुंडलिक पाटील. सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता.२९ : जिल्ह्याचा विकास ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे, त्या कृषी खात्याचे वर्ग एकचे तिन्ही अधिकारी प्रभारी आहेत आणि पाच तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारीसुद्धा प्रभारी असल्यामुळे जिल्ह्यासह पाच तालुक्यांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. जिल्ह्यात कृषी विभागात एकूण तब्बल ३३८ पदे रिक्त असून, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम करणाऱ्या कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त आहेत. यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचा विकास होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला असून, गावांची संख्या व रिक्त पदानुसार सुमारे ५०० गावांत कृषी सहायक नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात चार लाख ४४ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असून, सहा लाख ७५ हजार इतके शेतकरी आहेत. जिल्ह्यात कृषी विभागात ८१७ पदे मंजूर असताना कोविडपासून गेली तीन वर्षे ४७९ कर्मचाऱ्यांवर कृषी खात्याचा कारभार सुरू आहे. या विभागात गेल्या वर्षी ३०८ पदे रिक्त होती, यामध्ये पदे भरण्याऐवजी पुन्हा तीस पदे रिक्त झाली. अशी एकूण ३३८ पदे रिक्त असून, यामध्ये सर्वाधिक गावपातळीवर काम करणाऱ्या कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त असल्यामुळे शेतीच्या विकासकामांवर परिणाम होत आहे. कमी संख्येच्या कर्मचाऱ्यांना इतक्या मोठ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येत नाही, तसेच कार्यालयीन कामकाज राबवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले, यानंतर दत्तात्रय दिवेकर यांनी फक्त पाच महिन्यांसाठी या पदाचा कार्यभार सांभाळला. यानंतर आता पुन्हा हे पद प्रभारी असून, या ठिकाणी अरुण भिंगारदेवे हे प्रभारी कृषी अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. कृषी अधीक्षक, कृषी उपसंचालक, उपविभागीय अधिकारी ही प्रमुख तिन्ही पदे रिक्त असून, प्रभारींवर कामकाज सुरू आहे. आजरा, चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, कागल या प्रमुख तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असून, प्रभारींवर कामकाज सुरू आहे.
येत्या दोन वर्षांत कृषी खात्यात सुमारे ९० पदे रिक्त होतील, असे चित्र आहे. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, कीड-रोग नियंत्रण, पूरपरिस्थिती, नवीन तंत्रज्ञान, शेतकरी मंडळ स्थापन करणे अशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषी खात्याकडे कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र, रिक्त पदांमुळे शेतीच्या विकासावर परिणाम होत आहे. आजही खतांना लिंकिंग देऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात खते मारली जात आहेत, यावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. तीन ते पाच गावांसाठी एक कृषी सहायक असून, पीक सल्ला घेणे किंवा खते बी-बियाणे याबाबत सल्ला घेणे, याबाबत शेतकऱ्यांना अडचणी येत असून, शासनाने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी होत आहे.
...
‘जूनमध्ये अधीक्षक यांच्या बदल्या होतील. वर्ग एक व दोनचा विषय न्यायप्रविष्ट आहे. काही पदांची परीक्षा झाली आहे. आचारसंहितेनंतर नियुक्तीची कार्यवाही होईल.’
बसवराज बिराजदार, विभागीय कृषी सहसंचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com