
शिष्यवृत्तीत जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल
शिष्यवृत्तीत जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : राज्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याने अभूतपूर्व यश मिळवले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (ग्रामीण) राज्याच्या यादीतील १०२ पैकी ३३ तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (ग्रामीण )१२१ पैकी ४० मुले जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे ३० व २९ मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुन्हा एकदा जिल्ह्याने राज्यात अव्वल नंबर ठेवत शिष्यवृत्तीत कोल्हापूर पॅटर्न सिद्ध केला आहे.
कोल्हापूर विभागातील राज्याच्या यादीतील विद्यार्थी संख्या पाहिली असता जिल्ह्याच्या गुणवत्तेची कल्पना येते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर (३३), सातारा (१२), सांगली (८), रत्नागिरी (४) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे, तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर (४०), सातारा (१३), रत्नागिरी (१०), सांगली जिल्ह्यातील ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेला नाही.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता ५ वी) जिल्हा यादीत ५९१ विद्यार्थी पात्र ठरले होते, तर पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ८ वी) ५४० विद्यार्थी पात्र ठरले. यातील १० विद्यार्थी हे भूमिहीन शेतकरी, शेतमजुरांची मुले आहेत, तर १३ मुलं ही ग्रामीण अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत.
कोट
शिक्षकांचे मार्गदर्शनातील सातत्य व मेहनत, मुलांचे प्रयत्न यामुळे हे यश मिळाले आहे.
कोल्हापूरचा हा पॅटर्न राज्यात अनुकरणीय आहे. हा पॅटर्न कायम ठेवण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. जास्तीत जास्त मुलांनी यशस्वी व्हावे, यासाठी नियोजन केले जाणार आहे.
-एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक