
गड-घाळी श्रद्धांजली सभा
80452
घाळींनी वारसा दिला, तो सांभाळूया
गडहिंग्लजला शोकसभा; मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
गडहिंग्लज, ता. ४ : रत्नमाला घाळी व्यक्ती नसून संस्था होत्या. त्यांनी दुसऱ्याच्या सद्गुणांचे नेहमी कौतुक केले. आयुष्यभर चांगुलपणा जपला. त्यांचे विचार घेऊन जगण्याची गरज आहे. त्यंचा वारसा सांभाळूया, पुढे चालवूया, अशा शब्दात मान्यवरांनी विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांना श्रद्धांजली वाहिली.
रत्नमाला घाळी यांचे सोमवारी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, शैक्षणिक, सार्वजनिक, सामाजिक व सहकारी संस्थांतर्फे शोकसभा झाली. डॉ. घाळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शोकसभा झाली.
माजी आमदार श्रीपतराव शिंदे म्हणाले, ‘घाळी वहिनी म्हणजे आदर्शाची पावले होत्या. शत्रूवरही प्रेम करीत चांगुलपणा जपला. त्यांनी दिलेला वारसा सांभाळला पाहिजे.’ भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, ‘घाळी वहिनी व्यक्ती नसून संस्था होत्या. त्यांच्या नावाने स्वतंत्र संस्था सुरू करावी. त्यांच्या कार्याचा वारसा चालविण्याची जबाबदारी आपली आहे.’
माजी राज्यमंत्री भरमू पाटील, ‘शिवराज’चे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, ‘साधना’चे सचिव जे. बी. बारदेस्कर, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र लकडे, आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष संतोष चिक्कोडे, आय. जी. फुटाणे, मीना कोल्हापूरे, अॅड. व्ही. एस. पाटील, आर. पी. पाटील, प्रा. शिवाजी भुकेले, युवराज कदम, शिवाजी होडगे, शिवदास मुंडे, राजेश पाटील, सोमगोंडा आरबोळे, सुरेश संकेश्वरी, शीतल हिरेमठ, महाबळेश्वर चौगुले, नागेश चौगुले, रामाप्पा करिगार, सुनील शिंत्रे, अनुजा बेळगुद्री यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.