
कोल्हापूरचा पारा आणखी वाढणार
कोल्हापूरचा पारा
आणखी वाढणार
नागरिक हैराण; फेब्रुवारीतच तीव्र उन्हाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः मुसळधार आणि अतिवृष्टीचा पावसाळा. कडाक्याचा थंडीचा हिवाळा आणि आता फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाळा जाणवत आहे. सकाळी दाट धुके आणि दुपारनंतर ३७ ते ३८ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या तडाख्याने नागरिकांना हैराण केले आहे. दरम्यान, दिवसेंदिवस कोल्हापूरचा पारा आणखी चढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी दाट धुके किंवा थंडी जाणवते. मात्र, दुपारी बारानंतर सायंकाळी चारपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. दिवसाचे कमाल तापमान हे ३७ ते ३८ डिग्री सेल्सिअसवर राहत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. एप्रिल, मेदरम्यान त्यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्यात जेवढे तापमान असते ते आतापासूनच जाणवू लागले आहे. हवामानातील बदल आणि प्रदूषणामुळे तापमान वाढत असल्याचा अंदाज ही व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रासह कोल्हापुरातही यंदा तापमान वाढीच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे ऊस तोडणीवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. ऊस तोडणीसह शेतीची कामे पहाटे किंवा दुपारी बाराच्या आतच पूर्ण करावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये तापमानाचा पारा पहिल्यांदाच वाढला असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. एप्रिल, मे महिन्यामध्येही उन्हाचा तडाखा आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर शहरात दुपारी बारानंतर गर्दीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शीतपेय व फ्रूट सॅलडच्या टपरी व दुकानात मोठी गर्दी दिसून येत आहे.
---------------
कोट
गेल्या तीन वर्षांपासून हवामान बदलामुळे उन्हाळा लवकर सुरू होत आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या झळा फेब्रुवारीमध्येच जाणवू लागल्या आहेत. तापमानामध्ये यापुढे वाढ होत राहणार आहे.
- डॉ. आसावरी जाधव, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ