
आर्थिक विवंचनेतून प्राध्यापकाची आत्महत्या
84698
आर्थिक विवंचनेतून
प्राध्यापकाची आत्महत्या
राजाराम तलावात मृतदेह; मूळचे आटपाडीचे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२२ ः अपेक्षित पैसे कमवू शकलो नाही, आर्थिक विवंचनेतून मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून शिवाजी विद्यापीठातील हंगामी सहायक प्राध्यापकाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी आज दिली. डॉ. शैलेश रमाकांत वाघमारे (वय ३८, रा. केदारनगर, मोरेवाडी, मूळ रा. आटपाडी, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मृतदेह राजाराम तलावात रात्री उशिरा मिळाला. राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये याची नोंद झाली.
पोलिसांनी सांगितले, की ते, सहा वर्षांपासून विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात कार्यरत होते. पत्नीची मणक्याची शस्त्रक्रिया असल्याने त्यांनी २३ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान रजेवर असल्याचे विभागाला कळविले होते. ते, मंगळवारी रात्री पावणेआठपर्यंत विभागात होते. त्यांनी आटपाडीला येणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले; मात्र रात्री साडेनऊ वाजले तरी ते घरी आले नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील, भाऊ यांनी मोबाईलवर संपर्क साधला; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, एका विद्यार्थ्याला राजाराम तलाव परिसरात त्यांची दुचाकी दिसून आली. त्यांनी याची माहिती विभागाला दिली. डॉ. वाघमारे यांचे कुटुंबीय आणि विभागातील प्राध्यापकांनी याबाबत राजारामपुरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तपास केला असता त्यांचा तलावात मृतदेह आढळला. पंचनामा करताना पोलिसांना आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याची त्यांच्या हस्ताक्षरांमधील चिठ्ठी मिळाली आहे.
मनमिळावू, शांत स्वभाव
डॉ. वाघमारे यांनी शिवाजी विद्यापीठातूनच मायक्रोबायोलॉजीमध्ये पीएच.डी. पूर्ण केली होती. त्यानंतर ते याच विभागात हंगामी सहायक प्राध्यापकपदी रुजू झाले होते. ते मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.
डॉ. वाघमारे यांचे भाऊ मंगेश यांनी म्हणाले की, शैलेश यांना नोकरीचे टेन्शन होते. नोकरीत कायम कधी होणार? माझ्या नोकरीचे यापुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असे त्यांनी गेल्या आठवड्यात मला सांगितले होते. नोकरी आणि गृहकर्जाचा ताण घेवू नको. तू राजीनामा देवून घरी ये; आपण दुसरे काही काम करूया, असे घरच्या सर्वांनी त्यांना सांगितले होते. त्यावर बुधवारी शेवटचा पेपर आहे. परीक्षा झाली, की रजा टाकतो आणि त्यानंतर राजीनामा देण्याची प्रक्रिया करतो, असे त्यांनी सांगितले होते.
त्याने नैराश्य वाढले...
शैलेश अकरा महिन्यांच्या करारावर विद्यापीठात हंगामी सहायक प्राध्यापक म्हणून होते. या पदासाठी दरवर्षी निवड प्रक्रिया आणि ऑर्डर हातात पडण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी जायचा. पूर्ण ११ महिने कामही करता येत नव्हते. पदाचे वेतनही वेळेवर आणि पुरेसे नव्हते. त्यातून त्यांचे नैराश्य वाढत गेल्याचे मंगेश यांनी सांगितले.