लोकांना उध्वस्त करून विकास नको ः क्षीरसागर

लोकांना उध्वस्त करून विकास नको ः क्षीरसागर

86488

लोकांना उद्‌ध्वस्त करून मंदिराचा विकास नको
राजेश क्षीरसागर यांचे प्रशासनाला निर्देश; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा मिळाल्याच पाहिजेत. त्यासाठी भूसंपादन आवश्क आहे. मात्र, पहिल्यांदा शासकीय, निमशासकीय इमारतींचे संपादन करून भाविकांना मूलभूत सुविधा द्या. मंदिराभोवती वर्षानुवर्षे राहाणाऱ्यांचे उद्‌ध्वस्त करून विकास नको. या प्रश्वावर स्थानिक पातळीवर विस्तृत बैठक घेऊन त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक घेऊ, असे निर्देश राज्या नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मंदिर परिसरातील २३१ मिळकतधारकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भूसंपादनाबाबतचे विनंती पत्र पाठवले आहे. त्यामुळे येथील नागरिक आणि व्यापारी यांच्यात संभ्रम निर्माण झाला. याबाबत विचारणा करण्यासाठी आज क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.
माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘‘या परिसरात २०० वर्षांपेक्षा जास्त जुनी घरे आहेत. ते घरफाळा व सर्वप्रकारचे कर देऊन येथे राहतात. व्यापारी व्यवसाय करतात. येथे अतिक्रमण केलेली घरे नाहीत. याच परिसरात शासकीय, निमशासकीय जागा आहेत. आधी त्यांचा ताबा घेऊन भाविकांना सुविधा द्याव्यात. त्या नंतरही आवश्यकता भासल्यास या रहिवासी आणि खासगी मिळकतींचा विचार करावा.’’ महाद्वार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण नकाते म्हणाले, ‘‘कपीलतीर्थ मार्केटचा विकास केल्यास तेथे मंडईसह पार्किंग, यात्रीनिवास आणि प्रसादायलय बांधता येऊ शकते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला व्यापाऱ्यांचा विरोध नाही. पण, आधी शासकीय इमारतींचा विचार करावा.’’
क्षीरसागर म्हणाले, ‘‘तिरुपती, श्रीसिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर परिसराचा विकास व्हायला हवा. मात्र, स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊनच कामांचे नियोजन करावे. सुरुवातीला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची तपासणी करून विकासासाठी ताब्यात घ्याव्यात. उर्वरित कामांसाठी गरज भासल्यास खासगी जागांचा विचार व्हावा. व्यापारी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत गोयाणी, मारुती अंकलीकर, ऋषिकेश पाटील, विजय शहा, रोहन पोतदार, राजेश कन्नानी उपस्थित होते.

चौकट
प्रशासनाबद्दल नाराजी
क्षीरसागर बैठकीला आले त्यावेळी तेथे जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी उपस्थित नव्हते. आम्हाला गृहीत धरून कामकाज करू नका. बैठकीचे पत्र पाठवूनही येथे जबाबदार अधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com