
बावडा जलशुद्धीकरण केंद्र
89499
४० लाख लिटर शुद्ध पाणी वाया
कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातील चित्र; नागरी कृती समितीने केले उघड
कोल्हापूर, ता. १६ ः महापालिकेच्या कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याची बाब नागरी कृती समितीने उघड केली. दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून असलेल्या गळतीसाठी जलअभियंता कारणीभूत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही समितीने केली.
शहरातील अनेक भागात पाण्याची समस्या जाणवत आहे. शहरात पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडून आंदोलने केली जात आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावरील गळती दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून हालचाल केली जात नाही. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाखा अभियंत्यांची बैठक घेऊन गळती शोधून काढून दुरूस्त करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर समितीचे आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राला गुरुवारी भेट दिली. पुईखडी, चंबुखडी आणि कसबा बावडा इथल्या शुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दिवसाला १५० ते १६० एमएलडी पाणी उचल होते. गळतीमुळे ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. गळतीमुळे भरपूर पाणी असूनही नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातून निम्म्या ई वॉर्डाला पाणीपुरवठा होतो. येथून तीन ते चार वर्षे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाहून जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला. तांत्रिक विभागाचे सहायक अभियंता जयेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन वर्षे दिवसाला ४० लाख लिटर पाणी वाहून जात असल्याचे कबूल केले.
ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही. या दुरुस्तीसाठी जवळपास दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पण, ती दुरुस्तीही केलेली नाही. याबाबत ॲड. इंदुलकर म्हणाले, ‘‘जलअभियंत्यांना माहिती नसताना पाणीपुरवठ्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. ही गळती प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिली नाही, दुरुस्ती केली नसल्याबद्दल त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. गळतीतून होणारे नुकसान त्यांच्या पगारातून, प्रॉव्हिडंट फंडातून, ग्रॅच्युईटीमधून वसूल करावे.’’