
अमल महाडिक सभा
92774
...
विरोध झुगारून विस्तारीकरण करणारच ः अमल महाडिक
कोल्हापूर, ता. ३१ : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारे विरोधकच विस्तारीकरण का केले नाही म्हणून विचारताहेत. मात्र, कोणी कितीही विरोध केला तरी वर्षात कारखान्याचे विस्तारीकरण करणार असल्याची ग्वाही माजी आमदार अमल महाडिक यांनी आज दिली. तसेच, डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांची राजाराम कारखान्यात पोळी भाजणार नाही, अशी टीकाही त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली. प्रयाग चिखली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
महाडिक म्हणाले, ‘आजतागायत कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारी मंडळीच आज विस्तारीकरणाबाबत आम्हाला विचारणा करत आहेत. या गोष्टी सभासद शेतकरी जाणून आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये विरोधकांनी विस्तारीकरणाला केलेला विरोध सर्व सभासदांनी पाहिला आहे. मी विरोधकांना सांगू इच्छितो, इथून पुढे कोणी कितीही विरोध केला तरी राजाराम कारखान्याचे विस्तारीकरण हे होणारच. गगनबावड्यातील डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत; पण ही लबाडी राजाराम कारखान्याचा सूज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे. त्यामुळेच त्यांची पोळी इथे भाजली जाणार नाही, याची खात्री आता विरोधकांनाही पटलेली आहे.’
यावेळी बटूसिंग रजपूत, रघुनाथ पाटील, पांडबा यादव, संभाजीराव पाटील, हंबीरराव वळके, बी. आर. शिंदे, केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले, बाळासाहेब वरूटे, बाजीराव नाईक, इंद्रजित पाटील, बाजीराव पाटील, सुभाष पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.