विद्यापीठांनी पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी सखोल संशोधन करावे

विद्यापीठांनी पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी सखोल संशोधन करावे

फोटो-
.........

पंजाबराव देशमुखांच्या कार्याविषयी संशोधन करावे

शिवाजीराव देशमुख; शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहास प्रारंभ

कोल्हापूर, ता. १० : ‘कृषिमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा मोठा पगडा होता. त्यांनी अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताची काळजी वाहणाऱ्या भारत कृषक समाजाची स्थापनाही केली. विद्यापीठांनी डॉ. देशमुखांच्या कार्याविषयी सखोल संशोधन करावे’, असे आवाहन पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘भारतातील शेतीच्या समस्या’ या विषयावरील परिसंवादाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी संशोधन करण्यासाठी विद्यापीठातील विविध अधिविभागांनी एकत्र येऊन स्वरुप ठरवून त्या अनुषंगाने पुढे जावे.’
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘आपल्या सर्वंकष ज्ञानाच्या आधारे शाश्वत विकास आणि फिरते अर्थकारण यांचा जास्तीत जास्त वापर करून आपले पर्यावरण स्वच्छ व शुद्ध राखण्याची जबाबदारी आपणावर आहे.’
या कार्यक्रमास अर्थतज्ज्ञ डॉ. एस.टी. बागलकोटी, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. नितीन माळी, डी. श्रीकांत, वसंत लिंगनूरकर, आनंद खामकर, आदी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपा श्रावस्ती यांनी आभार मानले.
........

शेतीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी
बाह्य तज्ज्ञ व्यवस्थांनी पुढे यावे

देशमुख म्हणाले, ‘शेती हा अतिव्यापक विषय आहे. मजुरांची अनुपलब्धता, खते, बियाणे आदींच्या बाबतीत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, न परवडणारी जिरायती शेती आणि राज्याचा अवर्षणग्रस्त राहणारा ४० टक्के भूभाग या महाराष्ट्रातील शेतीसमोरील सर्वसाधारण प्रश्‍न आहेत. शेतीला पर्याय काढल्याखेरीज हे प्रश्न सुटणारे नाहीत. हे प्रश्न केवळ शेतकऱ्यांकडून सुटणारे नसून त्यांना सोडविण्यासाठी बाह्य तज्ज्ञ व्यवस्थांनीच पुढे यायला हवे.’
............................

पाली भाषा अभ्यासक्रमाला मान्यता

विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राच्या पाली भाषा आणि आरक्षणाचे संविधानात्मक धोरण या दोन विषयांवरील प्रत्येकी तीन महिन्यांच्या दोन अभ्यासक्रमांना व्यवस्थापन परिषदेची मान्यता प्राप्त झाल्याची माहिती संचालक डॉ. महाजन यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com