पाणी टंचाई

पाणी टंचाई

97863

शहरावर पाणी टंचाईचे संकट

नदीतील पाणी पातळी घटली ः आज, उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा

कोल्हापूर, ता. २२ ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंचगंगा व भोगावती नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याने शहरावर पाणी टंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे. नदीत पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाला महापालिकेने पत्र दिले असले तरी रविवार (ता. २३) व सोमवारी (ता. २४) शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. दरम्यान, आजही शहराच्या काही भागात पाणी टंचाई जाणवली, अशा भागात महापालिकेने टँकरची सोय केली होती.
कोल्हापूर शहराला भोगावती व पंचगंगा नदीतून पाणी उपसा केला जातो. पावसाळ्यापूर्वी धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी धरणे भरून ठेवली आहेत. दुसरीकडे पाणी उपसा बंदी मागे घेतल्याने शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे, त्याचाही परिणाम होऊन नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. काल मध्यरात्रीच नदीची पातळी एक मीटरने कमी झाली, त्यामुळे पाणी उपसा करणाऱ्या स्टेशनमधून पाण्याचा उपसा कमी होऊ लागला. त्याचा परिणाम शहरात आज कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत आहे.
यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने जलसंपदा विभागाशी संपर्क साधून पंचगंगा व भोगावती नदीत पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज पाणी सोडण्यात आले असले तरी उद्या व परवा शहरात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. संभाव्य पाणी टंचाईवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने नऊ टँकरची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
.............
03435
कुंभी नदी कोरडी ठाक

कुडित्रे, ता. २२ : कुंभी नदीवर उपसा बंदी नसतानासुद्धा पाणी न सोडल्यामुळे कुंभी नदी कोरडी ठाक पडली आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गारपीट झालेले उसाचे क्षेत्र वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या आठवड्यात वाकरे कुडित्रे भागात गारपीट झाली आणि सुमारे ३५ ते ४० हेक्टर ऊस पिकाचे ५० टक्केहून अधिक नुकसान झाले. गारपीट आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. महावितरण व पाटबंधारे विभागाची एकत्रित बैठक होऊन पाणी सोडणे व वीजपुरवठा करण्याबाबत चर्चा होऊनही पाणी सोडलेले नाही.
कुंभी नदीवर कोगेत बंधाऱ्यावर पाणी अडवून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या नदीच्या पाण्यावर कुडित्रे, कोगे, बहिरेश्वर, म्हारूळ, सांगरूळचे हजारो हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. नदीत पाणी नसल्याने ५०० मोटरी उघड्या पडल्या आहेत. नदीला पाणी नसल्यामुळे पिके वाळत आहेत. पाणी सोडावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने पांडुरंग पाटील-वाकरेकर यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com