जिल्‍ह्यातील राष्‍ट्रवादी अस्‍वस्‍थ

जिल्‍ह्यातील राष्‍ट्रवादी अस्‍वस्‍थ

जिल्‍हा राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत अस्‍वस्‍थता

शरद पवार यांचा राजीनामा ः पक्षाची मुहुर्तमेढ रोवलेल्या कोल्हापुरातील नेतेही हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.२: राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आणि राज्याच्या व देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. याचे पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्या‍प्रमाणेच जिल्‍ह्यातही उमटले. कोल्‍हापूर जिल्‍हा हा शरद पवार यांचे आजोळ आणि राष्‍ट्रवादी पक्षाच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवलेला जिल्हा. त्यामुळे श्री. पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेने जिल्‍ह्याच्या राष्‍ट्रवादीत आणि समाजमानसात त्याचे पडसाद उमटले. देशातील राजकीय वातावरण पाहता पवार यांनीच पक्षाध्यक्षपदी रहावे, अशी एकमुखी मागणी सर्वच कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

मागील ५० वर्षांहून अधिक काळ शरद पवार यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपली छाप निर्माण केली आहे. देशाचे राजकारण करतानाही गावागावातील कार्यकर्त्यांची विचारपूस श्री.पवार यांनी नेहमीच करत त्यांना मदतीचा हात दिला. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची माहिती ठेवून, त्यांना मदत करुन, त्यांना पदे देवून पक्षाची वीण घट्ट केली. त्यामुळे पद असो वा नसो, जिल्‍हा दौऱ्या‍वर आल्यानंतर श्री. पवार यांच्याभोवती असणारे कार्यकर्ते व नेत्यांचे मोहोळ कधी कमी झाले नाही. त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्त्याला पवार यांनी पूर्वीसारखेच राजकारणात सक्रीय राहण्याची अपेक्षा आहे.

खासदार पवार यांचा कोल्‍हापूर जिल्‍ह्याशी विशेष स्‍नेह आहे. त्यांचे आजोळ पन्‍हाळा तालुक्यातील गोलिवडे. याचा त्यांना सार्थ अभिमान. कोल्‍हापूरच्या भाषेवर, कार्यकर्त्यां‍वर त्यांचा विशेष जीव. जिल्‍ह्यावर कितीही संकटे आली तीर संकटमोचक म्‍हणून पवार हे नेहमीच धावून आले. त्यामुळे जिल्‍ह्याच्या सर्वांगिण क्षेत्रावर पवार यांचा प्रभाव आहे. पवार यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर राष्‍ट्रवादी पक्षाची स्‍थापना १९९९ साली केली. यावेळी राष्‍ट्रवादी पक्षाच्या स्‍थापनेची बैठक कोल्‍हापुरात झाली. जिल्‍ह्यातील बहुतांश दिग्‍गज नेत्यांची फळी राष्‍ट्रवादीत सहभागी झाली. त्यामुळे जिल्‍ह्याच्या राजकारणारवर राष्‍ट्रवादीचा दबदबा राहिला. आजही हा दबदबा कायम आहे.
....

कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत
राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्‍हा सर्वदूर व्यापला आहे. जेंव्‍हा केंव्‍हा पक्षाला सत्तास्‍थापनेची संधी मिळाली तेव्‍हा कोल्‍हापूरच्या वाट्याला मंत्रीपद देण्यात आले. कोल्‍हापूरला डावलून पवार यांनी मंत्रीमंडळ केले नाही. या सर्वाचा जिल्‍ह्याच्या राजकारणारवर परिणाम झाला. पवार यांचे विशेष प्रेम असल्यानेच राज्याच्या राजकारणात जिल्‍ह्याला झुकते माप देण्यात आले. आज पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि जिल्‍ह्यातील हजारो कार्यकर्त्यांना धक्‍काच बसला. कोणत्याही परिस्‍थितीत पवार यांनी आपला निर्णय बदलावा, अशी मागणी कार्यकर्ते करु लागले आहेत. पवार यांनी निर्णय बदलावा यासाठी कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीला लागले असल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com