
ज्योतीरादित्य शिंदे रविवारी इचलकरंजीत
ज्योतीरादित्य शिंदे रविवारी इचलकरंजीत
व्यापारी, उद्योजकांसाठी परिसंवादाचे आयोजन; विविध प्रश्नांवर होणार विचारमंथन
इचलकरंजी, ता. २ ः केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. ४) सकाळी साडेनऊ वाजता येथील नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात व्यापारी परिसंवाद आयोजीत केला आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरातील उद्योग, व्यवसाय याबाबत या परिसंवादात मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. हा मेळावा विविध संघटनांतर्फे आयोजित केला आहे. कार्यक्रमास व्यापारी व उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत, इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
यावेळी पॉवरलूम क्लोथ अँड यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी, एयरजेटलूम असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंड पाटील, यंत्रमाग धारक जागृती संघटनेचे विनय महाजन, शटललेस फॅब्रिक असोसिएशनचे अनिल गोयल, क्रेडाईचे अध्यक्ष मयूर शहा, वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशनचे गिरीराज मोहता, इचलकरंजी क्लोथ अँड अडत असोसिएशनचे जगदीशचंद्र छाजेड, सीए असोसिएशनचे अनिल राठी, इचलकरंजी सायझिंग असोसिएशनचे जयंतराव मराठे, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे विक्रम बुचडे, बिल्डर्स असोसिएशनचे फैयाज गैबान आदी उपस्थीत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्त १८० लोकसभा मतदारसंघात मोदी सरकारने खास प्रतिनिधींची निवड केली आहे. मोदी ॲट द रेट ९ या कार्यक्रम अंतर्गत केंद्र सरकारने देशातील प्रत्येक जिल्ह्यातील असणाऱ्या विविध समस्यांबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी एका प्रतिनिधीची निवड केलेली आहे. त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री शिंदे यांच्यावर आहे.
या कार्यक्रमाचे इचलकरंजीतील समन्वयक म्हणून भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या, सहसमन्वयक राजेंद्र बोहरा व भाजपा प्रदेश व्यापार प्रकोष्ठ अध्यक्ष विनोद कांकाणी आहेत. इचलकरंजी शहर आणि परिसरात यंत्रमाग कापड उद्योगासह विविध उद्योगाचे मोठ्या प्रमाणात जाळे आहे. या उद्योग व्यवसायातील विविध विषयांवर परिसंवादात चर्चा होणार आहे. त्याचबरोबर येथे विविध प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या आणि उपाययोजना याबाबत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी या मेळाव्यात ठोस धोरण घेतले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगीतले.